
Unseasonal rains hits Satara's Jawali, Wai and Mahabaleshwar area, Unseasonal rains, Satara News, Mahabaleshwar, Wai,
पाचगणी : सातारा जिल्ह्यातील जावळी, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून शेती पिकांनाही फटका बसला आहे. विशेषतः नुकतीच लागण करण्यात आलेल्या स्ट्रॉबेरीच्या मदर प्लांटसह टोमॅटो पिकाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले. त्यानंतर विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. काही भागांत पावसाचा जोर इतका होता की रस्त्यांवर पाणी साचले, तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला.
महाबळेश्वर, पाचगणी, जावळी आणि वाई परिसर हा स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी राज्यभर प्रसिद्ध आहे. सध्या या भागात स्ट्रॉबेरीच्या मदर प्लांटची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. मदर प्लांटच्या वाढीसाठी नियंत्रित हवामानाची आवश्यकता असते. मात्र अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे काही शेतांमध्ये पाणी साचल्याने रोपांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी वाऱ्यामुळे संरक्षक आच्छादने आणि शेडनेटचेही नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
याचबरोबर परिसरातील अनेक बागायती भागांमध्ये टोमॅटो पीक सध्या जोमात आले आहे. बाजारात टोमॅटोला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र या अवकाळी पावसामुळे टोमॅटोच्या फळांना तडे जाणे, फळगळ होणे तसेच रोगराई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या मते, गेल्या काही दिवसांपासून हवामान अनुकूल असल्याने पिकांची वाढ चांगली होत होती. मात्र ऐन हंगामात झालेल्या या अवकाळी पावसामुळे आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून पंचनामे करावेत आणि बाधित शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. जावळी, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यातील अवकाळी पावसाच्या या धुमाकूळामुळे शेतीसह दैनंदिन जनजीवनावरही परिणाम झाल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.
कोयना धरणाची पाणी पातळी घटली; बोटी वाहतूक ठप्प, पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम