वाईच्या आठवडी बाजारात अस्वच्छ पाण्यात भाजी धुण्याचा प्रकार
वाई : वाई शहरातील आठवडी बाजाराच्या दिवशी सोमवारी गणपती मंदिराशेजारील पुलाच्या खालच्या बाजूस नदीपात्रात अस्वच्छ पाण्यामध्ये भाजी धुण्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोमवारी आठवडी बाजार भरत असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आणला जातो. याच पार्श्वभूमीवर नदीपात्रात एका व्यक्तीकडून अस्वच्छ पाण्यामध्ये भाजी धुतली जात असल्याचे दिसून आले.
नदीपात्रातील पाण्याची स्वच्छता आणि त्यामध्ये असलेली घाण लक्षात घेता अशा पाण्याचा भाजी धुण्यासाठी वापर होत असल्याने त्या भाज्यांच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
भाजीपाला थेट नागरिकांच्या आहारात वापरला जात असल्याने तो कोणत्या पाण्यात धुतला जातो, त्याची स्वच्छता कशी केली जाते आणि विक्रीपूर्वी आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक काळजी घेतली जाते का, याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
विशेष म्हणजे, गणपती मंदिर परिसर आणि पुलालगतचा नदीपात्राचा भाग नागरिकांच्या वर्दळीचा असून, आठवडी बाजाराच्या दिवशी येथे मोठी गर्दी असते. अशा ठिकाणी उघडपणे अस्वच्छ पाण्यात भाजी धुतली जात असतानाही संबंधित प्रशासनाचे लक्ष का गेले नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अन्न व भाजीपाला विक्रीशी संबंधित स्वच्छतेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, तसेच नदीपात्राचा अशा प्रकारे वापर करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. वाई शहरातील आठवडी बाजारात विक्री होणाऱ्या भाजीपाल्याची स्वच्छता, विक्रेत्यांकडून वापरले जाणारे पाणी आणि बाजार परिसरातील स्वच्छता यांची संबंधित विभागाने तपासणी करून नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.






