धक्कादायक! शेतकऱ्याच्या 14 वर्षीय मुलाचं अपहरण, 60 लाख रुपयांची मागणी
वाशिम जिल्ह्यातील बाभूळगाव गावात धक्कादायक घटना घडली आहे. 60 लाख रुपयांच्या खंडणीसाठी 14 वर्षीय मुलाचं अपहरण करण्यात आलं आहे. अपहरणाच्या घटनेला तब्बल 5 दिवस उलटूनही पोलिसांना कोणताही सुगावा लावलेला नाही. दरम्यान, याप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत. अनिकेत साधुडे असं अपहरण झालेल्या मुलाच नाव आहे.
शेतकरी कुटुंबातील साधुडे यांनी काही महिन्यापूर्वी वाशिम पुसद मार्गावरील आपल्या शेतजमिनीची विक्री केली होती, त्यातून मोठी रक्कम साधुडे यांना मिळाली होती. साधुडे कुटुंबीयांकडे शेतजमिनीतून मिळालेली मोठी रक्कम असल्याची माहिती अपहरणकर्त्यांना होती. त्यातूनच या पैशावर डोळा ठेऊन साधुडे यांचा 14 वर्षीय मुलगा अनिकेतचे अपहरण करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण, अपहरणानंतर अनिकेतच्या घराबाहेर एका बंद लिफाफ्यात 5 पानी पत्रात खंडणीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे, अनिकेतच्या आई-वडिलांचे डोळे आपल्या मुलाच्या वाटेकडे लागले आहेत. माझ्या मुलाला सुखरुप माझ्याकडे पोहोचवावे, मी अपहरणकर्त्यांना त्यांची मागितलेली रक्कम द्यायला तयार आहे, असे म्हणत अनिकेतच्या वडिलांनी डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. तर, अनिकेतची आईही लेकाच्या आठवणीने आणि काळजीने व्याकूळ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
\
अनिकेतच्या अपहरणाच्या 5 दिवसांनंतर देखील पोलिसानां आरोपींचा व अनिकेतचा थांगपत्ता मिळेना. विशेष म्हणजे पोलिसांनी अनिकेतच्या तपासासाठी 9 विशेष पोलीस पथके रवाना केली असून शेकडो cctv, आणि मोबाईल नंबरचा डेटा तांत्रिकदृष्टया तपासणी केला आहे. अनिकेतच्या अपहरण करणाऱ्यांसह अनिकेतचा पत्ता न लागल्याने नेमकं अनिकेतच झालं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनिकेतच्या पालकांनी आपल्या मुलाचा शोध लागवा, याकरिता आपल्याला शेत जमिनीतून मिळालेली वाट्टेल ती किंमत मोजायला तयार असल्याचंही माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.