सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूप्रकरणात तिच्या कुटूंबाची अद्याप कोणतीही तक्रार राज्य महिला आयोगाकडे आली नाही. मात्र, आम्ही घटना घडल्यानंतर सुमोटो (स्वत: पुढाकार घेत) तक्रार दाखल केली. याप्रकरणी हगवणे कुटूंबातील ५ जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. यासंदर्भात बावधान पोलीस चंगल्या पध्दतीने काम करत आहेत. यामुळे महिला आयोग गंभीर नाही ही टीका योग्य नसल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.
वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी तसेच तिची जाऊ मयुरी हिने २०२४ मध्ये दिलेल्या तक्रारी प्रकरणी महिला आयोगाने नेमकं काय केलं? याच उत्तर आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत दिले. चाकणकर म्हणाल्या की, वैष्णवीच्या छळाबाबत महिला आयोगाकडे कुठलीही तक्रार आली नव्हती. मात्र, आत्महत्येची घटना घडल्यावर मी स्वत: याबाबत सुमोटो तक्रार दखल केली. त्यानंतर आरोपींना अटक केली आहे. अजून काही गुन्हे दाखल करायचे आहेत. याप्रकरणी पोलिसांबरोबर बोलणे सुरु आहे. यात अजून काही कलमं लागतील का? याबाबत विचारणाही केली आहे.
एकाच दिवशी परस्पर विरोधी तक्रारी दाखल
वैष्णवीच्या मोठ्या जावेबद्दल चाकणकर म्हणाल्या, आमच्याकडं एकाच दिवशी दोन तक्रारी मेलवरुन दाखल झाल्या आहेत. यात सुरुवातीला ६ नोव्हेंबर २०२४ रोजी मेघराज जगताप जे मयुरी जगताप हिचे भाऊ आहेत, त्यांनी तक्रार केली. नंतर रात्री १२ वाजता मयुरी जगताप यांची नणंद करिश्मा हगवणे हिने ई-मेलवरुन तक्रार केली आहे. एकाच दिवशी दोन तक्रारी आल्यानं बावधन पोलिसांकडं या तक्रारी पाठवल्या आणि कारवाईच्या सूचना दिल्या. एकाच कुटुंबातील वाद असल्यानं व परस्परविरोधी तक्रारी आल्याने हा कौटुंबिक वाद भरोसा सेलमध्ये काऊन्सिलिंग करुन सोडवला जावा यासाठी प्रयत्न करण्यात आले. नियमानुसार तीन वेळा काऊन्सिलिंग करणे गरजेचे असते. त्यानुसार यामध्ये प्रक्रिया पार पाडली. याप्रकरणी दोषारोप पत्र दाखल होत असल्याची माहिती यावेळी रुपाली चाकणकर यांनी दिली.
मयुरी संदर्भात राजकीय दबाव असता तर…
राजकीय दबाव असता तर सुमोटो तक्रार केली नसती. दोन्ही महिला असल्याने कौटुंबिक विषय असल्याने समुपदेशनाच्या माध्यमातून कुटूंब एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आम्ही २४ तासांत एफआयआर दाखल करायला लावली. यामुळे विरोधकांचे आरोप आम्ही फेटाळून लावत आहोत.