शेतकऱ्यांच्या जगण्याचे वास्तव साहित्यिकांनी मांडावे - राजू शेट्टी
कराड : शेतकऱ्यांच्या जगण्याचे वास्तव साहित्यिकांनी समाजासमोर मांडले पाहिजे, साहित्यिकांनी लिखाण करताना पुरस्कारासाठी न करता समाजाच्या हितासाठी करून त्यावरील उपाय देखील त्यामध्ये सूचित करावेत. तरच साहित्य अधिक समृद्ध होईल, असे माजी खासदार व शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितले.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित मराठी साहित्य संमेलनात ‘कृषक समाज काल आज आणि उद्या’ या विषयावरील परिसंवादात त्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष विकास भोसले, शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजेपवार, शेतीमित्र अशोकराव थोरात, कराड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाश पाटील, संचालक नितीन ढापरे, परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा.डॉ. नितीन नाळे, राज्य उपाध्यक्ष डॉ. हनुमंत चिकणे उपस्थित होते.
राजू शेट्टी म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या बाबतीत शासकीय व्यवस्थेची भावना बोथट झाली आहे. वर्षानुवर्षे शेतकरी अन्याय सहन करत आहेत. भारतीय संस्कृतीचा उदय शेतकऱ्यांपासून झाला आहे. भांडवलदाराने शेतकऱ्यांना लुटण्याचे काम आजपर्यंत केले. स्वामीनाथन, सुब्रमण्यम यांनी देशात हरितक्रांती आणली. शेतकऱ्यांनी समृद्धी आणली त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. साहित्यिकांनी शेतकऱ्यांचे चित्र योग्य पद्धतीने रंगवले नाही. गोरगरिबांचे शोषण करणारा, फेटा उडवणारा अशा पद्धतीचे चित्रण मराठी साहित्यात व चित्रपटात रंगवले गेले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जगण्याचे वास्तव साहित्यिकांनी समाजासमोर मांडले पाहिजे’.
ते म्हणाले, ‘उत्पादन खर्च प्रतिदिन वाढत आहे. या उलट शेतकऱ्याचे उत्पन्न घटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून, दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. शरद जोशी म्हणायचे, सरकारचे धोरण हेच शेतकऱ्याचे मरण आहे. आसमानी संकटाचा सामना करत शेतकरी शेती करत असताना सरकार सुलतानी संकट शेतकऱ्यांवर लादत आहे. बाजार पेठ व उत्पादित मालाची नेमकी माहिती सरकारकडून शेतकऱ्यांना दिली जात नाही. त्यामुळे शेतकरी आतबट्ट्यात येत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी असेल तर सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन तसे कायदे करायला हवेत.
देशात शेतकऱ्यांची मोठी पिळवणूक
डॉ. शरद गोरे म्हणाले, या देशात शेतकऱ्याची मोठी पिळवणूक होत आहे. जात व धर्म ही व्यवस्था बोगस आहे. शेतकरी व बहुजन समाजाला दाबण्यासाठी प्रयत्न झाले. मराठी राजभाषा आहे. संस्कृत कधीही राजभाषा नव्हती. याचे कोणतेही संदर्भ साहित्यात आढळून येत नाहीत. महात्मा फुले यांनी सांगितले होते, सर्वात पहिली गुलामी वैचारिक केली जाते. ही व्यवस्था बदलण्यासाठी विचारवंतांना पुन्हा एकत्रित करावे लागेल.