
Raigad Zilla Parishad: पनवेलमध्ये निवडणूक रणधुमाळी रंगली! ७५ % झाले मतदान; उमेदवारांची वाढली धाकधूक
पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या निवडणुकांचे अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी मोठ्या प्रमाणावर झालेल्या माघारीनंतर प्रत्यक्ष लढतीसाठी ६४ उमेदवार मैदानात उतरले आहेत. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एकूण ११९ अर्ज वैध ठरले होते. यामध्ये
जिल्हापरिषद गटासाठी ३८ तर पंचायत समिती गणांसाठी ८१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते. मंगळवार हा अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस होता. या अखेरच्या दिवशी तब्बल ५५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणूक रिंगणातील चित्र बदलले आहे.
पनवेल तालुक्यातील ३४६ मतदान केंद्रावर ८ गट व १६ गणासाठी पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी एकुण ३४६ पथके तयार करण्यात आली होती. ही पथके के. ई. एस. इंदुबाई ए. वाजेकर, इंग्लिश मेडीयम शाळा पनवेल येथुन मतदान यंत्रासह आपल्याला नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर आवश्यक पोलीस बंदोबस्तासह तैनात होते. या निवडणूकीकरीता पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद रायगड गटासाठी एकुण १८ उमेदवार व पंचायत समिती पनवेल गणासाठी एकुण ४६ उमेदवार निवडणूक लढवत आहे. त्यासाठी पनवेल तालुक्यातील १८०० कर्मचारी मतदान केंद्रावर कर्मचारी व मतदान यंत्रे सुरक्षित पोहोच करण्यासाठी मतदान प्रक्रियेसाठी कार्यान्वित होते. त्यासाठी जवळपास ४० एस.टी. बसेस, ३० मिनी बसेस व २१ इको वाहन व क्षेत्रीय अधिकारी यांना ४४ चारचाकी वाहने पुरविण्यात आली होती. आता ९ तारखेला लागणाऱ्या निकालाची प्रतिक्षा आहे.
या निवडणूकीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे, निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी मिनल भामरे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मनुष्यबळ पथक, वाहन पथक, आचारसंहिता पथक, संगणकीय कामकाज पथक अशा विविध पथकाने जवळपास एक महिन्यापासुन पुर्वतयारी केली होती.
या निवडणुकीत बहुतेक जिल्हा परिषद गटांमध्ये शेकापचे ‘खटारा’ आणि भाजपचे ‘कमळ’ यांच्यात दुरंगी लढत झाली आहे. केवळ दोन गट वगळता उर्वरित सर्व ठिकाणी थेट सामना रंगला असल्याने राजकीय चुरस वाढली आहे. पंचायत समितीच्या अनेक गणामध्ये मात्र तिरंगी लढत पार पडल्याने मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर पडते? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.