
फोटो सौजन्य - Social Media
आजच्या माहितीप्रधान युगात केवळ पाठांतरावर आधारित ज्ञान पुरेसे नसल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला जाणार आहे. ‘इंडिया के टॉप 1%’मध्ये स्पर्धकांना विविध आव्हानांचा सामना करावा लागेल. या आव्हानांमधून त्यांची विचारशक्ती, समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता, पॅटर्न ओळखण्याचे कौशल्य आणि दबावाखाली शांत राहण्याची ताकद तपासली जाईल. स्पर्धा जसजशी पुढे सरकेल, तसतसे अधिक कठीण टप्पे पार करत केवळ सर्वोत्कृष्ट स्पर्धकच अंतिम फेरीपर्यंत पोहोचतील.
या शोबद्दल बोलताना अनिल कपूर म्हणाले, “भारत हा अशा लोकांचा देश आहे ज्यांच्याकडे नैसर्गिक बुद्धिमत्ता, निरीक्षणशक्ती आणि परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची अद्भुत क्षमता आहे. आपल्या देशातील अनेक लोक जीवनातील अनुभवातून शिकतात आणि त्यांची हीच ताकद त्यांना वेगळे बनवते. आपण ‘जुगाड’ करण्याच्या क्षमतेचा अभिमान बाळगतो आणि तीच आपली खरी सुपरपॉवर आहे.”
ते पुढे म्हणाले, “जेव्हा मी ‘इंडिया के टॉप 1%’चा फॉरमॅट पाहिला तेव्हा तो मला खूप वेगळा आणि उत्सुकता वाढवणारा वाटला. हा शो स्पर्धकांना माहितीवर आधारित प्रश्न विचारत नाही, तर त्यांचा मेंदू दबावाखाली किती प्रभावीपणे काम करतो, याची परीक्षा घेतो. हा मंच भारतीयांच्या विचारशक्तीला आणि कॉमन सेन्सला योग्य न्याय देणारा आहे.”
स्टार प्लसवर प्रसारित होणारा ‘इंडिया के टॉप 1%’ हा शो प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच विचार करायला भाग पाडणारा अनुभव देईल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. अनिल कपूर यांच्या दमदार उपस्थितीमुळे शोबद्दलची उत्सुकता आणखी वाढली असून, हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.