
दयानंद खांडेकरांना काही दिवसांपूर्वी जयरामच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. खरतर या प्रकरणात खांडेकरांना अडकवण्यात आलं होतं हे तारिणीला पुरेपुर माहिती असतं. तारिणी खांडेकरांना निर्दोष सोडवण्यासाठी प्रयत्न करत असते. मात्र युवराज केदारचे दयानंद खांडेकरांच्या विरोधात कान भरत असतो. या सगळ्यात युवराजला बाप लेकात दुरावा निर्माण करण्यात यश मिळणार तितक्यात सगळं सत्य बाहेर येतं.
तारिणी केदारला सांगण्याचा प्रयत्न करते की, दयानंद खांडेकर यांची या प्रकणात काहीही चूक नाही. त्याचवेळी केदारला तारिणीचं म्हणणं काहीसं पटायला लागतं. जयरामचा फोन रिपेअर झाल्यावर केदारच्या हाती जे काही लागतं त्यावरुन त्याच्या पायाखालची जमीन सरकते. जयरामने सांगितलं होतं की, केदारच्या आईच्य़ा मृत्यूसाठी दयानंद खांडेकर जबाबदार नाहीत. वडीलांचं हे सत्य जेव्हा केदारला कळतं त्यावेळी तो दयानंद खांडेकरांना भेटण्याचा प्रयत्न करतो. केदार त्याच्या मिशनच्या जागी जात असताना त्याला दिसतं की, दयानंद खांडेकर एका मोठ्या धावत्या ट्रकसमोर उभे राहत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावेळी केदार खांडेकरांना वाचवतो. दयानंद खांडेकर त्याला म्हणतात की, तू का वाचवलस मला ? त्यावेळी केदार म्हणतो आई सोडून गेली आता तुम्ही मला पोरकं करणार आहात का ? त्यावेळी दयानंद खांडेकर केदारला मिठी मारत खूप रडतात. तारिणी देखील त्यावेळी तिथे पोहोचते आणि तिला आनंदाने रडू येतं. मालिकेचा हा भाग 27 एप्रिलला प्रसारित होणार आहे. बाप लेक एकत्र आल्यावर युवराज आता पुढची काय खेळी खेळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.