कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अंतरपाट’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. या मालिकेत सध्या गौतमी आणि क्षितिजचा पारंपरिक लग्नसोहळा पार पडताना दिसणार आहे. या लग्नसोहळ्याचं विशेष आकर्षण गोष्ट पाहायला मिळणार आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरांगत चालत आलेले लोकसंगीत हा महिके मध्ये पाहायला मिळणार आहे. मराठी टेलिव्हिजन विश्वात पहिल्यांदाच ‘अंतरपाट’ मालिकेत पारंपरिक लग्नसोहळ्यादरम्यान महाराष्ट्राच्या लोकसंगीताचं अनोखं दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे.
गौतमी-क्षितिजचा लग्नसोहळा हा वैविध्यपूर्ण गोष्टींनी सजला आहे. बेगडी दिखाव्याच्या काळात आपला लग्नसोहळा अत्यंत परंपरापूर्ण व्हावा ही गौतमीची असलेली इच्छा आता पूर्ण होताना दिसत आहे. आपल्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्त्वपूर्ण दिवस अनोख्या पद्धतीने सजवण्यासाठी गौतमी आग्रही होती आणि तिच्या इच्छेनुसार अत्यंत मऱ्हाठमोळ्या पद्धतीने गौतमी- क्षितिजचा हा विवाहसोहळा पार पडतोय याचा आनंद गौतमीला अधिक झालेला दिसून येत आहे. मराठी मातीतील संगीत आणि लोकपरंपरेच्या साथीने हा लग्नसोहळा साजरा करण्यात येणार आहे.
आजकाल लग्नसोहळ्यात चकचकीत रोषणाईने सजवलेले हॉल, ट्रेंडिंगच्या नावाखाली केले जाणारे विविध प्रकार पाहायला मिळतात. पण या सगळ्या झगमगाटात महाराष्ट्राची परंपरा आणि सांस्कृतिक वैभव बाजूलाच झाली आहे. पण महाराष्ट्राच्या या गतवैभवाला ‘अंतरपाट’ या मराठी मालिकेने लग्नसोहळ्याच्या निमित्ताने या सगळ्याला उजाळा दिला आहे. क्षितिज आणि गौतमीच्या लग्नात कोणताही दिखावा न करता लोककलेच्या माध्यमातून आलेल्या पाहुण्याचं मनोरंजन करण्यात आले असून, ‘दादला नको गं बाई’ हे भारूड, ‘धरिला पंढरीचा चोर’सारख्या गीतांचा समावेश या लग्न सोहळ्यात पाहायला मिळणार आहे.
शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. आधीच्याकाळी लग्नसोहळ्यात मराठमोळ्या परंपरेचा आणि लोककलेचा समन्वय दिसत असे परंतु ते आज मात्र कुठेतरी हरवत चालले आहे. लोककलेच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचा हा समृद्ध वारसा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कलर्स मराठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. ‘अंतरपाट’ मालिकेतील रश्मी अनपट आणि अक्षय ढगे हे कलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडत आहेत. त्यांच्या भूमिकांसह पारंपरिक वेशभूषेमुळे लग्नसोहळा अधिकच उठून दिसतो आहे.