
Manoj Jarange Patil
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत प्रश्न विचारला असता, फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. आंदोलनस्थळी सरकारचे प्रतिनिधी उपस्थित असून ते आंदोलकांशी चर्चा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वीही चर्चेतून मार्ग काढण्यात आला असून यापुढेही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच कायद्याच्या चौकटीत, संविधानाशी सुसंगत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन न करणाऱ्या मागण्यांवर सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध
दरम्यान, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही सरकार मराठा समाजाच्या प्रश्नावर सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधत असून पुढील एक-दोन दिवसांत तोडगा निघण्याची शक्यता असल्याचा विश्वास भरणे यांनी व्यक्त केला.
परभणीतील खासदार बंडू जाधव यांच्या शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत. मात्र, या कार्यक्रमाला मनोज जरांगे पाटील यांनी विरोध केला आहे. शिंदे यांनी परभणीत येऊ नये, अशी भूमिका त्यांनी घेतली.
या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधला. हा कार्यक्रम मराठा समाजाच्या विरोधात नसल्याचे शिंदे यांनी सांगितल्याचा निरोप कडू यांनी जरांगेंना दिला.
अंतरवाली सराटीत बोलताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली. फडणवीस यांचे “100 टक्के दिवस भरले आहेत”, असा दावा करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
त्याचवेळी परभणीतील परिस्थितीवरूनही जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली. आंदोलनादरम्यान संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनासमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, सरकार आणि जरांगे यांच्यातील चर्चेतून पुढील काही दिवसांत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काय तोडगा निघतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.