खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे आता आक्रमक; आता बंडखोर खासदारांच्या थेट मतदारसंघात जाऊन... (फोटो - सोशल मीडिया)
हिंगोली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार बंड करून शिंदेसेनेत दाखल होणार आहेत. या घटनेनंतर काही तासांत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे तब्बल १४ ते १५ आमदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचा दावा करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. या संदर्भात ते प्रसारमाध्यमाशी बोलत होते.
अलीकडेच ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्षाला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. या सहा खासदारांमध्ये हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचाही समावेश आहे. आष्टीकर यांच्या प्रवेशानंतर हिंगोलीसह मराठवाड्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे, असेही आमदार बांगर यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर बोलताना आमदार बांगर यांनी आपल्या पूर्वीच्या दाव्याची आठवण करून दिली.
दरम्यान, सहा महिन्यांपूर्वीच खासदार नागेश पाटील आष्टीकर आमच्यासोबत येतील, असे मी सांगितले होते. आज तो दावा खरा ठरला आहे. त्यामुळे आता ‘आगे आगे देखो होता है क्या’ अशी परिस्थिती आहे, असे ते म्हणाले.
शिवसेना अधिक सक्षम
पुढे बोलताना आमदार बांगर यांनी आणखी एक राजकीय गौप्यस्फोट केला. राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार असून, अनेक आमदार संपर्कात आहेत. योग्य वेळ आल्यावर सर्व काही समोर येईल, असे सांगत त्यांनी नव्या राजकीय घडामोडींचे संकेत दिले. मात्र, संपर्कात असलेल्या आमदारांची नावे जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला.
शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली
ठाकरे गटातील खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दावा बांगर यांनी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोकप्रतिनिधी पक्षात येत आहेत. त्यामुळे शिवसेना अधिक सक्षमपणे पुढे जात आहे, असे ते म्हणाले.
आता हिंगोलीमधील विकासकामांना मिळेल गती
लोकसभा निवडणुकीनंतर हिंगोलीसह मराठवाड्यातील अनेक विकासकामे रखडल्याची चर्चा होती. मात्र, खासदार आष्टीकर यांच्या प्रवेशानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकासकामांना गती मिळेल, असा विश्वासही बांगर यांनी व्यक्त केला. दरम्यान, संतोष बांगर यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले असून, ठाकरे गटातून आणखी काही आमदार शिंदे सेनेच्या वाटेवर आहेत का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
निकाल लागताच ओमराजे निंबाळकर यांचं मोठं वक्तव्य, ‘पोलीस, सीआयडीवर प्रचंड दबाव..,’






