
अजित पवारांचे दोन्ही पुत्र येणार सक्रिय राजकारणात; पार्थ की जय राज्यसभेवर कोण जाणार?
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. तत्पूर्वी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता या पदावर कोण असणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच पार्थ पवार की जय पवार याची चर्चा सुरु आहे.
अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, आता त्यांच्या वारसांनी पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेण्याची तयारी सुरू केली आहे. अजितदादांचे दोन्ही पुत्र पार्थ पवार आणि जय पवार हे आगामी काळात राजकारणात अधिक सक्रिय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर या दोघांपैकी एकाची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ पवार यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सध्या सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या कार्यकाळाची दोन वर्षे शिल्लक आहेत. ४ जुलै २०२८ मध्ये ही मुदत संपणार आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: कोकणाबाबत एकनाथ शिंदेंचे मोठे विधान; म्हणाले, “लक्ष्मी ऑरगॅनिकसारखे प्रदूषणकारी…”
दरम्यान, केवळ दोन वर्षांच्या उर्वरित टर्मऐवजी पार्थ पवार यांना सहा वर्षांच्या पूर्ण मुदतीसाठी राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली पक्षात सुरू आहेत. एकीकडे सुनेत्रा पवार राज्याचे नेतृत्व करतील, तर दुसरीकडे पार्थ किंवा जय यांपैकी एक जण संसदेत पक्षाचा आवाज बनतील, असे चित्र सध्या दिसत आहे. पक्षाच्या आगामी बैठकीत या महत्त्वपूर्ण निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोघांपैकी एक राज्यसभेवर जाईल, असे चित्र सध्या दिसत आहे.
सुनेत्रा बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री
उपमुख्यमंत्रिपदानंतर सुनेत्रा यांना बीड आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्याचे सरकारी आदेश जारी करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री असताना अजित पवारांनी या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. त्यामुळे आता या दोन्ही महत्त्वाच्या जिल्ह्यांचा विकास करण्याची महत्त्वाची जबाबदारी सुनेत्रा यांच्याकडे असेल.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : राष्ट्रवादी विलिनीकरणावरुन रंगलं राजकारण! शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना धरलं धारेवर