कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी शेतीमध्ये घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असताना भाजपा युतीचे सरकार मात्र त्याकडे गांभिर्याने पाहात नाही. शेतकऱ्यांना भरघोस निधी दिल्याच्या घोषणा करून फक्त जाहिरातबाजी करण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या निधीवर मात्र कृषी विभागातील अधिकारी व मंत्री संगनमताने खिसे भरत राहिले. शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने नॅनो युरीया व नॅनो डीएपी च्या १५८ कोटींचा खरेदीत ८७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असून कृषी विभागातील भ्रष्टाचारांची सखोल चौकशी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावे असे आव्हान महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.
कृषी विभागातील घोटाळ्याचा पर्दाफाश करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एकामागोमाग एक घोटाळांचे आरोप केले आहे. नाना पटोले यांनी आज नॅनो युरीया व नॅनो DAP खरेदीमधील घोटाळ्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने नागपूरच्या पालिवाल माहेश्वरी हाऊस ऑफ बिझनेस एँड रिसर्च मार्फत हा भ्रष्टाचार केला आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने NANO UREA व NANO DAP उत्पादनासाठी कच्चा माल खरेदी करण्याकरिता आग्रीम स्वरूपात १५८.७९२ कोटी रुपयांचा निधी अदा करून घेतला. महामंडळ NANO UREA व NANO DAP हे इफ्को कडून विकत घेऊन पुरवठा करणार होते, यात कच्चा मालाच्या खरेदीचा प्रश्न येत नाही. ही खरेदी प्रक्रिया ही कृषी विभागाच्या इतर प्रक्रियेप्रमाणे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना निवडणूक आयोगाची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे ३०/०३/२०२४ रोजी निविदा प्रकाशित केली, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“महायुती सरकारने सरासरी २२२ रुपये प्रती बॉटल जास्त दराने खरेदी करुन ८७ कोटी १५ लाख ४२ हजार २५२ रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. इफ्को हे कृषी उद्योग विकास महामंडळाचे वितरक आहे, २०२३-२४ मध्ये इतर निविष्ठा इफ्कोकडून थेट खरेदी करून शासनास पुरवठा करीत होते. परंतु महामंडळाने २०२४-२५ साठी ३८ लाख बाटल्यांचा पुरवठा करण्यासाठी निविदा काढली हे आश्चर्यकारक व संशयास्पद आहे. निविदेतील अटी व शर्तीप्रमाणे निविदा ५० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या उत्पादकांसाठीच होती पण अट शिथिल करुन फक्त १ कोटी रुपयांची उलाढाल असे करून उत्पादक/ विक्रेता/उत्पादकाचे अधिकृत प्रतिनिधि असा बदल करण्यात आला. महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ हे स्वतः इफ्कोचे वितरक असता वरिल अटी व शर्ती बदल करून खाजगी विक्रेत्यांमार्फत खरेदी कारण्याची प्रक्रिया संशयास्पद आहे,” असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“नॅनो डीएपी निविदेत पालिवाल या एकाच निविदा धारकाने भाग घेतला असता त्याला पात्र ठरवण्यात आले व त्यालाच पुरवठा आदेश देण्यात आला. याच निविदा धारकाचे NANO UREA Plus चे दर एल-२ आले असता त्यालाच एल- १ दराने पुरवठा आदेश देण्यात आला. या प्रक्रियेत नॅनो युरियाचे एल वन दर, रे नॅनो सायन्स यांचे आले असता त्यांना न देता त्यांच्या एल-१ दराने पालिवाल यांना पुरवठा आदेश देण्यात आले असता रे नॅनो यांनी व इतर निविदाधारकाने कुठल्याच प्रकारे तक्रार केली नाही असे समजते. यावरून सर्व भाग घेतलेल्या निविदाधारकांनी संगनमत करून निविदा प्रक्रीयेत महामंडळातील अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने भ्रष्टाचार केल्याचे दिसत आहे असे देखील नाना पटोले म्हणाले आहेत. राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या करत असताना महायुती सरकार मात्र शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्यात मस्त आहेत, अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.