
"विकसित भारताचा नव्हे विकसित भाजपचा अर्थसंकल्प", यशोमती ठाकुर यांची टिका
मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा आर्थिक अर्थसंकल्प २०२६ सादर केला असून हा अर्थसंकल्प सामान्य माणूस, महिला, शेतकरी आणि तरुणांवर लक्ष केंद्रित करणारा असल्याचे म्हटले जाते. या अर्थसंकल्पाचा एकूण आकार ५३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. याच अर्थसंकल्पावर आता काँग्रेसकडून टिका करण्यात आली.
केंदीय अर्थसंकल्प जिथे निवडणूका आहेत. त्यांच्यासाठी चांगला, जिथे निवडणुका नाहीत, त्यांच्यासाठी काही नाही. म्हणजे विकसित भारतासाठीचा नव्हे, तर विकसित भाजपचा अर्थसंकल्प आहे, अशी टिका काँग्रेस नेत्या, माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात रविवारी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. देशात सध्या महागाई, बेरोजगारी, उद्योगधंद्याचे संकट अशी बिकट परिस्थिती आहे. देशाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, सामाजिक विकास आणि लोककल्याणकारी योजनांबाबतही हा अर्थसंकल्प दिशाहीन वाटतो. विशेष म्हणजे ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत, त्यांच्यासाठीच अधिक तरतुदी केल्याचे स्पष्टपणे जाणवते, तर ज्या राज्यांमध्ये निवडणुका नाहीत त्यांना पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आले आहे. देशातील सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. अशावेळी सामान्य जनतेला आधार देईल, देशाच्या अर्थचक्राला गती देईल असा अर्थसंकल्प मांडला जाईल अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा होती. मात्र केंद्रातील भाजप सरकारने सर्वसामान्यांना कोणताही दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर केला नाही.
या अर्थसंकल्पावर यशोमती ठाकूर यांनी जोरदार टिका केली, केंद्रीय अर्थसंकल्प अतिशय निराशाजनक आणि हास्यास्पद आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, मध्यमवर्गीयांसाठी काहीही ठोस तरतूद दिसत नाही. जीएसटीचा फटका एवढ्या मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्याचे निराकरण कसे करता येईल याचे देखील काही निराकरण या अर्थ संकल्पात दिसत नाही. विकासकामे दिसत नाहीत, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.
या अर्थसंकल्पात महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी, महागाई कमी करण्यासाठी काहीच उपाययोजना दिसत नाहीत. सर्वसामान्य माणूस आज महागाईमध्ये होरपळून निघाला आहे. मात्र सरकारला यावर उपाययोजना या अर्थसंकल्पात करता आलेल्या नाहीत. त्यामुळे हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा नाही, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.
आज देशातील शेतकरी अत्यंत संकटात आहे, या शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या ठोस अशा कोणत्याही तरतुदी अर्थसंकल्पात दिसत नाहीत. शेतकरी आस्मानी सुलतानी अशा दोन्ही संकटांना तोंड देत आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीबाबत, कर्जमाफीबाबत किंवा शेतीमालाला हमीभाव देण्याबाबत या अर्थसंकल्पात कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, अशी टिका यशोमती ठाकूर यांनी केली आहे.