
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार, १२ जून) पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. राज्यातील राजकारणात काही लहान पक्षांचे काँग्रेसमध्ये संभाव्य विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करताना काँग्रेसला ‘बुडते जहाज’ असे संबोधले. त्यांनी स्पष्ट केले की, जरी विरोधी पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले, तरी त्याचा सर्वाधिक फायदा भाजपलाच होईल. नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाच्या पूर्ततेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर निशाणा साधला. यावरून आता काँग्रेसनेही जशास तसे प्रत्युत्तर दिले असून “भाजपा मित्रपक्ष गिळणारी ‘चेटकीण’’ असल्याचे म्हंटले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेस (SP) चे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याबाबतच्या चर्चांनीही पक्षाच्या २७ व्या स्थापना दिनाच्या सुमारास जोर धरला होता. काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी असा दावा केला की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव यापूर्वीच मांडण्यात आला होता; या विधानानंतर या चर्चेने अधिक जोर धरला.
आमदार नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, “शरद पवार यांनी यापूर्वी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव पाठवला होता, परंतु काही कारणांमुळे त्यावर पुढे कोणतीही प्रगती होऊ शकली नाही. देशभरातील समान विचारसरणीच्या पक्षांना एकत्र आणण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तृणमूल काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) देखील या दिशेने विचार करत आहेत.” मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हे दावे फेटाळून लावले.
विलीनीकरणाच्या चर्चांवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “बुडत्या जहाजावर स्वार न होण्याइतपत ते शहाणे आहेत. काँग्रेस हे बुडते जहाज आहे आणि प्रादेशिक पक्ष आपले भविष्य त्याशी जोडण्याची इच्छा बाळगतील, असे वाटत नाही. जरी विरोधी पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले तरी भाजपचे कोणतेही नुकसान होणार नाही; उलट, त्यामुळे पक्षासाठी अधिक राजकीय संधी निर्माण होतील. “जर त्यांनी विलीनीकरण केले, तर तो आमचा फायदाच आहे, नुकसान नाही. विरोधक आपली स्वतंत्र ओळख जितकी गमावतील, तितकी भाजपसाठी राजकीय जागा मोकळी होईल. सध्या आम्ही ‘वाट पाहा हे धोरण अवलंबत आहोत.” असे मुख्यमंत्री म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेतला. ते यावेळी म्हणाले, “काँग्रेस पक्ष या देशाची आशा आहे,. काँग्रेस पक्ष या देशाचा डीएनए आहे आणि भाजपाला फक्त काँग्रेस पक्षच आव्हान देऊ शकतो. आणि २०१४ मध्ये जे काँग्रेसमुक्त भारत करण्याचा वल्गना करत होते, त्यांचा पक्षच आज काँग्रेसयुक्त झाला आहे. फडणविसांनी त्यांच्या आजूबाजूला पाहिले तर काँग्रेसचेच लोक दिसतील. भाजपा मात्र मित्रपक्ष गिळणारी ‘चेटकीण’ आहे,” असे सपकाळ म्हणाले.