
परभणीत उबाठाचा मुस्लिमधार्जिणा चेहरा समोर आला, संजय निरुपम यांची खरमरीत टीका
परभणीत मुस्लिम महापौर करुन उबाठाचे मुंबईवर लक्ष असल्याचा उबाठाचा छुपा अजेंडा समोर आला. मुंबई महापालिका निवडणुकीवेळी उबाठा आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मुंबईचा महापौर फक्त मराठी होईल, असा संकल्प केला होता. मात्र परभणी महापालिकेत उबाठाने मुस्लिम नगरसेवकाला महापौरपदी बसवले, मग मुंबईत मराठी महापौर बनवण्याचा मुद्दा मतांसाठी होता का, असा सवाल निरुपम यांनी यावेळी उपस्थित केला. उबाठाच्या मुस्लिमधार्जिण्या भूमिकेमुळेच मुंबई महापालिकेत मुंबईकर मतदारांनी उबाठाचा पराभव केला, अशी टीका निरुपम यांनी केली. मुस्लिम महापौर केल्यानं निवडणुकीत उबाठाची स्पर्धा एमआयएम, काँग्रेस आणि मुस्लिम पक्ष व संघटनांशी होईल, असे निरुपम म्हणाले.
बाळासाहेबांनी देशभक्त मुस्लिमांना कधीही विरोध केला नाही. भारतावर प्रेम करणारे मुस्लिम आमचे आहेत, असे बाळासाहेब म्हणायचे. उबाठाने बाळासाहेबांचे विचार सोडले. मुस्लिम मतांसाठी काँग्रेसी विचारधारा स्वीकारली अशी टीका निरुपम यांनी केली. मुंबईत आणि महाराष्ट्रात हिंदू समाजाच्या हिताचे रक्षण करणाचे आणि बाळासाहेबांचा वारसा पुढे नेण्याचे काम शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत, असे ते म्हणाले. मुंबईतील बांग्लादेशी घुसखोरांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी निरुपम यांनी यावेळी केली.
तसेच शिवसेना नेते संजय निरुपम यांनी काँग्रेस पक्षाच्या चिंता आणि इतर मुद्द्यांना उत्तर दिले. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की २०२९ पर्यंत पक्षाची स्थिती आणखी बिकट होऊ शकते. निरुपम म्हणाले, “हे शेख चिल्लीच्या स्वप्नासारखे आहे. देशभरातील काँग्रेस पक्षाची सध्याची परिस्थिती पाहता, मला वाटते की २०२९ पर्यंत ते आणखी कमकुवत होईल. पक्षाचा जनसमर्थन आणखी कमी होईल.”