सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : महाराष्ट्रचा कारभार हाकणाऱ्या मंत्रालयाच्या इमारतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी मोठी कारवाई केली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनातील एका लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या घटनेमुळे मंत्रालयात खळबळ उडाली असून, या प्रकरणावरुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
सपकाळ म्हणाले, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री, नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने लाचलुचपत विभागाने मंत्री कार्यालयच सिल केले आहे. या घटनेने भाजपा महायुती सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या लाचखोरीची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मंत्री नरहरी झिरवळांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
मंत्रालयातील लाचखोरीवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात लोकाभिमुख कारभार करण्यासाठी लोकांना सरकार आपले वाटावे यासाठी राज्य सरकारचे मुख्यालय असणाऱ्या सचिवालयाचे नाव बदलून मंत्रालय करण्यात आले. पण महाभ्रष्ट भाजपा महायुतीने मंत्रालयाचे भ्रष्टाचारालय केले आहे. झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिकाने वरिष्ठांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे, हे आणखी धक्कादायक आणि गंभीर आहे. त्यामुळे मंत्री नरहरी झिरवळ यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
“संबंध आढळल्यास राजीनामा देईन” अशी भूमिका मंत्री नरहरी झिरवळ यांनी मांडली आहे मात्र नैतिक जबाबदारीच्या दृष्टीने, आपल्या कार्यालयात खुलेआम लाचखोरी सुरु असल्याचे समोर आल्यावर निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
…तर मी राजीनामा देईन – झिरवळ
राज्याच्या मंत्रिमंडळाच्या इमारतीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी कारवाई केली. यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनातील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आले आहे. ही लाच स्वीकारताना संबंधित लिपीकाला रंगेहात पकडल्यामुळे मंत्रीमंडळात खळबळ उडाली. यामुळे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर देखील ताशेरे ओढले जाऊ लागले. यावरुन झिरवळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, “संबंधित कर्मचारी हा सरकारी कर्मचारी असून त्याच्या वैयक्तिक कृत्याशी माझा किंवा माझ्या सचिवांचा संबंध नाही. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. जर या लाचखोरीच्या प्रकरणात माझ्यापर्यंत किंवा माझ्या कार्यालयातील इतर कोणापर्यंत धागेदोरे पोहोचले, तर मी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देईन,” अशी स्पष्ट भूमिका नरहरी झिरवाळ यांनी घेतली आहे.






