वसेना आणि अजित पवार गटाचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केला (फोटो - सोशल मीडिया)
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकीय वक्तव्य केली आहेत. तसेच राज्यामध्ये लवकरच गौप्यस्फोट होणार असल्याचा दावा त्यांनी केला. खासदार राऊत म्हणाले की, “मी वारंवार हेच सांगतो की, राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे. सुनेत्रा पवार त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे अजितदादांचे सहकारी आहेत. नवीन रचनेत सुनेत्रा पवारांचे ते सहकारी असतील असे नाही. त्यांच्या पक्षातील अंतर्गत बाबीत दुसऱ्या पक्षाने का बोलावे हा माझा कायम प्रश्न आहे. त्यांनी काय पत्र लिहिले, कोणती पद दिले हा त्यांचा विषय आहे. पण भविष्यामध्ये या पक्षातील २५-३० आमदारांसह हा पक्ष भाजपामध्ये विलीन होईल. त्याचे नेतृत्व कुणाकडे असेल हे आताच सांगत नाही,’ असे स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : शिंदे गटाच्या ‘डिनर’ला ठाकरे गटाचे खासदार! ‘ऑपरेशन टायगर’ची पुन्हा चर्चा; राजकीय वर्तुळात खळबळ
पुढे संजय राऊत यांनी भाजपमध्ये जाणाऱ्या आमदारांचा थेट आकडा सांगितला. ते म्हणाले की, “पुढील काही काळात शिंदेसेनेतील २५ आमदार हे भाजपामध्ये जातील. हे आमदार भाजपामध्ये विलीन होण्याच्या मानसिकतेत आहेत. फक्त त्यांना काही काळ वेट अँड वॉच असे सांगण्यात आले आहे. सुनेत्रा पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेचा पक्ष यांना विलीन व्हावे लागेल,” असे राऊतांनी म्हटले आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
हे देखील वाचा : तो आक्षेपार्ह व्हिडिओ अन् पक्षाची झाली थू-थू; सुनेत्रा पवारांचा थेट झिरवळांना फोन
शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर
शिवसेना शिंदे गटाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या डिनर डिप्लोमसीसाठी ठाकरे गटाचे दोन खासदार उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या डिनरसाठी ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर आणि खासदार संजय देशमुख उपस्थित होते. ही माहिती समोर आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे नांदेडचे खासदार नागेश आष्टीकर आणि यवतमाळचे खासदास संजय देशमुख यांनी प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजनाला उपस्थित होते.यावरून चर्चा सुरू झाल्यानंतर, आम्ही केवळ शुभेच्छा देण्यासाठी गेलो असल्याचे स्पष्टीकरण नागेश आष्टीकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिले.






