Maharashtra Politics: शिंदे गटाच्या 'डिनर'ला ठाकरे गटाचे खासदार! 'ऑपरेशन टायगर'ची पुन्हा चर्चा; राजकीय वर्तुळात खळबळ
राज्यात गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे नांदेडचे खासदार नागेश आष्टीकर आणि यवतमाळचे खासदास संजय देशमुख यांनी प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजनाला उपस्थित होते.यावरून चर्चा सुरू झाल्यानंतर, आम्ही केवळ शुभेच्छा देण्यासाठी गेलो असल्याचे स्पष्टीकरण नागेश आष्टीकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिले.
यासंदर्भात बोलताना खासदार आष्टीकर म्हणाले की, प्रतापराव जाधव यांच्या अॅनिव्हर्सरीच कार्यक्रम होता. त्यासाठी त्यांनी आम्हाला सभागृहातच विनंती केली होती. त्यासाठी आम्ही त्यांना फक्त शुभेच्छा देण्यासाठी घरी गेलो होतो. ५-१० मिनीटांसाठी भेटलो. याचा अर्थ आम्ही काही वेगळ्या चर्चा करण्यासाठी गेलो नव्हतो. काही बातम्या नसल्या की ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू होतात, पण त्यात काही तथ्य नाही. कोणाच्या सुख-दु:खात एकमेकांना भेटलं पाहिजे, असं मला वाटतं. आम्ही सर्वजण एकाच सभागृहातील आहोत त्यामुळे यात काही गैर नाही.
सध्या शिंदे गटाकडे सात खासदार आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे सहा खासदार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा खासदार फोडण्यासाठी शिंदे गटाने तयारी केली होती. पण शरद पवार गटाचे ६ आणि ठाकरे गटाचे ६ खासदार फोडल्यास शिंदे गटाकडे १९ खासदार होती. या १९ खासदांराच्या बळावर राज्याच्या राजकारणात बार्गिनिंग पावर वाढवता येईल, महायुतीमध्ये शिवसेनेची (शिंदे गट) ताकद भाजपच्या तोडीस तोड करणे. आगामी लोकसभा निवडणुकीत किमान १९ जागांवर दावा ठोकण्यासाठी आतापासूनच भक्कम पाया रचण्याची रणनीती आखली होती.
शिंदेंनी ही रणनीती आखली असली तरी, भाजप नेतृत्वाने याला अद्याप संमती दिलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दिल्ली दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली नसल्याचे समजते. पक्षांतर आणि फोडाफोडीच्या या नव्या मोहिमेला भाजपकडून सध्या ‘ग्रीन सिग्नल’ मिळालेला नाही, ज्यामुळे शिंदेंच्या या योजनेसमोर अडथळे निर्माण झाले आहेत.
ठाकरे आणि पवार गटाचे खासदार फोडल्यास महाविकास आघाडीला मोठा धक्का बसू शकतो, मात्र भाजप स्वतःचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी शिंदेंना इतकी मोठी मोकळीक देणार का? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी न होणे, हे या रणनीतीला मिळालेला थंड प्रतिसाद मानला जात आहे.






