
'मोदी सरकार लोकशाही मानत नाही, त्यांचा खरा चेहरा आता जनतेसमोर'; नाना पटोलेंचे टीकास्त्र
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी मोठं विधान केले आहे. भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे नेते जे. पी. नड्डा हे देशातील प्रादेशिक पक्ष संपवण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला. जनभावनांकडे दुर्लक्ष करून देशात भीतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचेही ते म्हणाले.
माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी अनेक मुद्यांवर भाजपला लक्ष्य केले. ते म्हणाले, नरेंद्र मोदी सरकार दबाव आणि भीतीचे राजकारण करत आहे. विविध प्रादेशिक पक्ष फोडून लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मोदी सरकार लोकशाही मानत नाही. त्यांचा खरा चेहरा आता जनतेसमोर येत आहे, अशी टीकाही केली. मंदिरासाठी जमा झालेल्या निधीच्या मुद्द्यावर बोलताना पटोले यांनी मंदिरासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केल्याचे सांगितले. राम मंदिरासाठी जनतेने दिलेल्या पैशांचा हिशेब अद्याप स्पष्ट करण्यात आलेला नाही.
दरम्यान, धर्माच्या नावावर पैसा गोळा करून तो राजकीय कामांसाठी वापरला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी या संदर्भात केलेले वक्तव्य योग्य असल्याचेही पटोले म्हणाले.
नरेंद्र मोदी यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल प्रेम
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पटोले यांनी टीका केली. मोहन भागवत यांना पाकिस्तानबद्दल प्रेम निर्माण झाले आहे, तर नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल प्रेम निर्माण झाले आहे. असा टोला पटोले यांनी लगावला. ज्या देशांमध्ये भारताचा अपमान केला जातो, त्या देशांबद्दलच या नेत्यांना आकर्षण वाटते. नरेंद्र मोदी त्या देशांचे आभार मानतात, तर मोहन भागवत शत्रूराष्ट्रांशी जवळीक साधत आहेत, असा आरोपही पटोले यांनी केला.
Ramdas Athawale : ‘उरलेल्यांनी रिपब्लिकन पक्षात यावे’; टीएमसीच्या खासदार-आमदारांना आठवलेंचे आवाहन