उरलेल्यांनी रिपब्लिकन पक्षात यावे'; टीएमसीच्या खासदार-आमदारांना आठवलेंचे आवाहन
पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अश्यातच, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) उर्वरित खासदार आणि आमदारांना रिपब्लिकन पक्षात (RPI) प्रवेश करण्याचे आवाहन केले आहे. तृणमूल काँग्रेसमधील कथित बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
रामदास आठवले यांनी म्हटले की, “तृणमूल काँग्रेसचे काही खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आधी मिळाली असती तर त्यांनी त्यांना रिपब्लिकन पक्षात येण्याचे आवाहन केले असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा असलेल्या रिपब्लिकन पक्षात तृणमूल काँग्रेसच्या उर्वरित खासदारांनी सहभागी व्हावे,” असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दावा केला की, “तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांनी पक्षाचे नेतृत्व सोडून स्वतंत्र राजकीय भूमिका स्वीकारली आहे. या पार्श्वभूमीवर उर्वरित खासदारांनीही रिपब्लिकन पक्षात प्रवेश करण्याचा विचार करावा,” असे आवाहन त्यांनी केले.
रामदास आठवले यांनी केवळ खासदारांनाच नव्हे तर पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनाही रिपब्लिकन पक्षात येण्याचे आवाहन केले. तृणमूल काँग्रेसविरोधात भूमिका घेणाऱ्या आमदारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित राजकारणासाठी RPI मध्ये सहभागी व्हावे, असे त्यांनी म्हटले.
ठाकरे गटाचे खासदार फुटणार? ‘ऑपरेशन टायगर’ बद्दल उदय सामंतांचे मोठे वक्तव्य
आठवले यांनी तृणमूल काँग्रेसमधील असंतोषासाठी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वशैलीला जबाबदार धरले. त्यांच्या नेतृत्वाखालील दबावामुळे अनेक लोकप्रतिनिधी उघडपणे भूमिका घेऊ शकत नव्हते, असा दावा त्यांनी केला. मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत काही खासदार आणि आमदारांनी वेगळी वाट निवडल्याचे त्यांनी नमूद केले.
तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करताना रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा उर्वरित खासदार आणि आमदारांना रिपब्लिकन पक्षात येण्याचे आवाहन केले. त्यांच्या या विधानानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणातील घडामोडींवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.






