
पत्रकारांना धमकावणारे खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा! (Photo Credit- X)
वाढता वाद पाहता संजय दिना पाटील यांनी एक विशेष व्हिडिओ जारी करत पत्रकार बांधवांची मनापासून दिलगिरी व्यक्त केली आहे. हा प्रकार का घडला, याचे स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, ज्या दिवसापासून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्या दिवसापासून मला सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवरून शिवीगाळ करून माझा अपमान केला जात आहे. मी तो अपमान सहन केला. आज सकाळी काही पत्रकार मित्र आले होते, तेव्हा मी त्यांना हात जोडून विनंती केली होती की, मला पक्षप्रवेशाबद्दल काहीही विचारू नका; मला जे बोलायचे होते ते बोलून झाले आहे.”
माझ्या आजच्या प्रतिक्रियेतून पत्रकार बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. pic.twitter.com/sxFRrcuvov — Sanjay Dina Patil (@SDPatil_16) June 25, 2026
ते पुढे म्हणाले, “शिवसेनेत जाण्याचा निर्णय माझा वैयक्तिक होता. पण माझ्या कुटुंबाला, माझ्या पत्नीला आणि दिवंगत वडिलांबद्दल खोट्या व वाईट गोष्टी पसरवल्या जात आहेत. पत्रकार याच मुद्द्यावर प्रश्न विचारत होते. मी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण वाद वाढत गेला आणि माझ्या तोंडून चुकीचे अपशब्द निघाले.”
आपल्या कृत्याचा पश्चात्ताप व्यक्त करताना खासदार पाटील म्हणाले की, माझ्याकडून जे अपशब्द वापरले गेले, त्यासाठी मी त्या पत्रकार मित्रांची आणि संपूर्ण पत्रकार समूहाची जाहीर माफी मागतो. “तुम्ही माझ्या राजकीय निर्णयावर कितीही टीका करा, त्याला माझी हरकत नाही; परंतु कृपा करून माझ्या कुटुंबाला या वादापासून दूर ठेवा,” अशी भावनिक विनंतीही त्यांनी शेवटी केली.
शिवसेना पक्षप्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय दिना पाटील आणि पत्रकारांमध्ये जोरदार वाद झाला. यावेळी त्यांच्याकडून पत्रकाराला थेट धमकावण्यात आले. “रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे, कमिशनरकडे जाऊन तक्रार करा. तुमची इज्जत करतोय, तुम्हाला सहन करतोय, खूप दिवस सहन केलं. मग अजून कशाला गां## घुसताय. अरे कोणत्याही गोष्टीची लिमिट असते. सांगितलं ना सर्व. त्याने काही बोलूदे. तुझ्या आ## ### गेलं, आणि आता माझ्याकडे येऊ नका. माझ्याकडे काही घ्यायला आला तर मारणार. रेकॉर्ड करा आणि सांगा. तुम्ही आता मला विचारायला आलात तर मार खाणार”, अशा भाषेत खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकाराबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.
पत्रकार दादा/ताई प्रश्न विचारतात तर त्याला हे संजय दीना पाटील “कशाला गां*** बोटं घालताय?” म्हणतात? संजय दीना पाटील सारखे माजोरडे लोकं पत्रकारांना शिव्या देतात, मारण्याची भाषा करतात. ही भाषा लोकप्रतिनिधीला शोभते का?#लोकशाहीचाचौथास्तंभ #सत्तेचामाज #माजोरडेलोकप्रतिनिधी… pic.twitter.com/SCRyaK8O0Q — Ayodhya Poul – अयोध्या पौळ पाटील. (@PoulAyodhya) June 25, 2026
पत्रकारांना दिलेल्या धमकीबाबत मुंबई पोलिसांनी आणि गृहमंत्रालयाने कोणताही राजकीय पक्षपात न करता कारवाई करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. कॅमेऱ्यासमोर हत्या आणि स्मशानाची भाषा करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले. मुंबईचे पोलीस आयुक्त सक्षम आहेत, मात्र एखादा लोकप्रतिनिधी त्यांना जुमानत नसेल तर त्याला कायद्याची जाणीव करून द्यावी, असे राऊत म्हणाले. महाराष्ट्रातील परिस्थितीची तुलना बिहारशी करत त्यांनी कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
स्वतः शिवीगाळ केल्याच्या आरोपांबाबत बोलताना राऊत म्हणाले की, एखाद्याला राजकीय टीका करणे आणि थेट जीवे मारण्याची धमकी देणे यात मोठा फरक आहे. गद्दारी करणाऱ्यांना गद्दार म्हणणे चुकीचे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.