
Prafull Patel criticized Raj Thackeray regarding the NCP national presidency
सुनेत्रा पवार यांचा सुतकामध्ये शपथविधी सोहळा झाल्यामुळे सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया देत पवार कुटुंबाच्या परंपरेबाबत सांगितले. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, प्रत्येक कुटुंबाची एक वेगळी प्रथा आणि परंपरा असते. काही लोक म्हणत होते की एवढ्या दिवस शोक असतो त्या काळामध्ये शपथविधी नाही केला पाहिजे. मात्र पवार कुटुंबामध्ये त्यांची परंपरा राहिली आहे की ते तीन दिवसांचा शोक पाळतात. आणि त्यानंतर आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी ते बाहेर पडतात. त्यामुळे चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडला, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
हे देखील वाचा : सुनील तटकरे यांच्या नावाने बनावट पत्र, सही अन् शिक्के; राष्ट्रवादीमध्ये जोरदार राजकारण सुरु
त्याचबरोबर अजित पवारांनंतर राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी प्रफुल्ल पटेल प्रयत्न करत असल्याचा आरोप मनसे नेते राज ठाकरे यांनी केला होता. मराठमोळ्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष पटेल होण्यापेक्षा पाटील चालेल अशा आशयाचे वक्तव्य राज ठाकरेंनी केले. यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही घेऊ. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडेल. आम्ही सगळे मिळून योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यासाठी सर्व पक्षामधून एकमताने निर्णय घेण्यात आला असून एकही नेत्याने याला विरोध केला नाही, असे मत प्रफुल्ल पटेल यांनी मांडले.
तर त्यांना लाज वाटली पाहिजे
त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांनी मनसे नेते राज ठाकरेंना देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, “बाहेरचे लोक आमच्या पक्षाबद्दल काय बोलत आहेत? ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही असे लोक का बोलत आहेत? 1952 पासून माझ्या वडीलांना महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिले आहे. मलाही लोकांनी निवडणुकीमध्ये भरभरुन प्रेम दिलं आहे. आमच्याबद्दल आणि आमच्या पार्श्वभूमीबद्दल कुणी कमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटली पाहिजे. मी महाराष्ट्राचा जनप्रतिनिधी म्हणून बसलो आहे. पक्षाचा निर्णय योग्य होईल. आणि माझ्या शिवायच होईल,अजून काय सांगायचं आहे?” असा संतप्त सवाल प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थित केला.
हे देखील वाचा : पवार कुटुंबियांमध्ये किती दिवसांचा दुखवटा? टीका करणाऱ्यांना प्रफुल्ल पटेलांचे उत्तर, म्हणाले…
राज ठाकरे वाकरे माझ्या पक्षाचे आहेत का?
पुढे ते म्हणाले की, “आमच्या पक्षामध्ये संशय निर्माण करणं हे घाणेरडं राजकारण आहे. आम्ही आमचा योग्य निर्णय घेऊ. माझ्या शिवाय योग्य व्यक्तीला पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडून दिलं जाईल हे मी स्पष्टपणे सांगतो. जी जबाबदारी माझ्यावर आहे की मी योग्य पद्धतीने पार पाडतो. राज ठाकरे वाकरे माझ्या पक्षाचे आहेत का? की माझ्या पक्षाचा कोणता नेता आहे? आम्हाला राज ठाकरे किंवा सकाळी 9 चं बुलेटीन वैगरे किंवा तेलंगणाचा कुणी आहे त्यांनी आम्हाला सांगू नये,” अशी टीका प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे.