
मोदी सरकारवर पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात (Photo Credit- X)
ठाकरे गटातील नऊपैकी सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिल्याच्या वृत्ताचा उल्लेख करत चव्हाण म्हणाले, या घडामोडींचे अद्याप खंडन झालेले नाही. केंद्र सरकारला उत्तर भारतातील राज्यांचे राजकीय वजन वाढविण्यासाठी लोकसभेची पुनर्रचना करायची असून, त्यासाठी आवश्यक बहुमत मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांतील फोडाफोडी वाढल्याचे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप निवडणुका प्रामाणिकपणे जिंकू शकत नसल्याचा आरोप करत त्यांनी दुबार मतदान, बोगस मतदान आणि ईव्हीएम संदर्भातील शंका उपस्थित केल्या. लोकसभेत मोठे बहुमत मिळवून देशातील राजकारणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न सुरू असून, देशात एका व्यक्तीकेंद्रित सत्ताकारणाची प्रवृत्ती वाढत असल्याची टीकाही त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फोडाफोडीच्या चर्चा सुरू असल्याच्या प्रश्नावर चव्हाण यांनी, केंद्रीय यंत्रणांचा दबाव वापरून राजकीय पक्षांमध्ये प्रवेश घडवून आणला जात असल्याचा आरोप केला. सध्याचे सरकार भ्रष्टाचाराने ग्रासलेले असून, सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची आहे. महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या फुटींना केंद्रातील मोदींचा राजाश्रय असल्याचा आरोप करत त्यांनी रोजगार, शेती आणि महागाई या प्रश्नांवर केंद्र सरकारने लोकांची फसवणूक केल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारा वर्षांच्या कार्यकाळाबाबतच्या प्रश्नावर त्यांनी, देशाची अर्थव्यवस्था, रुपयाचे अवमूल्यन, वाढती महागाई आणि परराष्ट्र धोरणातील प्रश्न उपस्थित करत केवळ परदेश दौरे करून विकास होत नसल्याची टीका त्यांनी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याचे भाजपला आदेश आहेत. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशांचा वापर होत आहे. देशातील लोकशाही कमकुवत होत असून, भ्रष्टाचारातून मिळणारा पैसा निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी वापरला जात असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. महाविकास आघाडीचे उमेदवार अभय जगताप यांना पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत मतदारांनी विचारपूर्वक मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग बदलल्याने निर्माण झालेल्या चिंतेबाबत प्रशासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली. काही ग्रामपंचायतींनी नदीचे पाणी पिण्यासाठी वापरू नये, असा इशारा दिला असल्याचा उल्लेख करत त्यांनी नदीत रासायनिक पदार्थ मिसळल्याच्या चर्चा असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती देणार आहे. संबंधित केमिकल कोणत्या कारखाना, उद्योग किंवा अन्य कोणत्या कारणाने नदीत आले, याचा शोध प्रशासनाने घ्यावा, असे त्यांनी सांगितले.