पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
आगामी काळात देशात सत्ताबदल निश्चितपणे होईल आणि त्यासाठी विरोधी पक्ष किंवा काँग्रेस कारणीभूत ठरणार नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षांतील कारभारामुळेच हा बदल घडेल, असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. शुक्रवार (21 ऑगस्ट) नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “2029 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान असणार नाहीत. त्यामुळे भाजपमध्ये आतापासूनच नेतृत्वाचा चेहरा बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उपपंतप्रधान व्हायचे आहे,” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
केंद्रात सत्ताबदल कधी होईल, हे काळ ठरवेल. मात्र, मोदी सरकारच्या उर्वरित कार्यकाळात देशाचा पुढचा पूर्णवेळ शिक्षणमंत्री कोण असेल, हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. सध्या प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यांच्याकडे आधीपासूनच इतर महत्त्वाची खाती असल्याने शिक्षणासारख्या मोठ्या खात्यासाठी पूर्णवेळ मंत्र्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देशाला विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेणारा आणि परीक्षाव्यवस्थेतील गोंधळ कमी करण्यासाठी प्रभावी भूमिका घेणारा शिक्षणमंत्री आवश्यक आहे. मूलभूत शिक्षणातील समस्या जाणणाऱ्या व्यक्तीकडे हे खाते असावे, असे चव्हाण म्हणाले. मात्र, सध्याच्या मोदी सरकारमध्ये अशा प्रकारची योग्य व्यक्ती दिसत नसल्याची टीकाही त्यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मोठी जबाबदारी मिळण्याच्या चर्चा सुरू असल्या तरी ते शिक्षणमंत्री झाल्यास आम्ही त्याला विरोध करू, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर पेपरफुटीच्या घटना घडल्या असून, त्यामुळे फडणवीस शिक्षणमंत्रीपदासाठी योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.
नाशिकच्या पायाभूत सुविधांवरही चव्हाण यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. समृद्धी महामार्गाने प्रथमच नाशिकला येताना योग्य दिशादर्शक फलक नसल्याने रस्ता चुकल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. शहरात येताना खड्ड्यांचाही अनुभव आल्याचे ते म्हणाले.
आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये तब्बल सहा कोटी लोक आले, तर शहराची यंत्रणा आणि पायाभूत सुविधा हा प्रचंड भार झेलू शकतील का, याचा गांभीर्याने विचार झाला आहे का, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. कुंभमेळ्याच्या तयारीत केवळ खर्चावर भर न देता नियोजन आणि दर्जेदार सुविधा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.






