
कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी दोन टप्प्यांत नियोजन केले आहे. कार्यक्रमस्थळी सुमारे ५०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. मुख्य प्रवेशद्वार, वाहनतळ, प्रमुख चौक तसेच कार्यक्रम परिसरावर पोलिसांचे बारकाईने लक्ष राहणार आहे. कार्यक्रमस्थळी प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणीही केली जाणार आहे.
मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक सहभागी होणार असल्याने परिसरातील वाहतुकीवरही ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्रपणे ७०० वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष वाहतूक आराखडा तयार केला असून, गर्दी वाढल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
राहुल गांधींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पण या कार्यक्रमाच्या एक दिवस आधीच मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. सीओईपी कॉलेजच्या आवारात आणि वसतिगृहात विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित हल्ल्यानंतर राजकीय वातावरण तापले. या घटनेची माहिती मिळताच, काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार घटनास्थळी दाखल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी कॉलेजच्या आवारात आंदोलन सुरू केले. विजय वडेट्टीवार, सतेज पाटील आणि विश्वजीत कदम यांनी धरणे आंदोलन केले. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या घटनेनंतर, दोन काँग्रेस कार्यकर्ते जखमी झाल्याचे वृत्त आहे. दोघांनाही उपचारासाठी सांचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे काँग्रेस नेत्यांनी जखमी कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
राहुल गांधींचा ‘छत्रौं की गुंज’ हा कार्यक्रम २२ ऑगस्ट रोजी पुण्यात होणार आहे. या कार्यक्रमासंदर्भात पोलीस आणि प्रशासनाने आधीच अनेक अटी लागू केल्या आहेत. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी कॉलेज कॅम्पसमध्ये झालेल्या भांडणानंतर सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.