पुण्यातील राहुल गांधींच्या कार्यक्रमावर फडणवीसांचा गंभीर आरोप
राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित करत काही खळबळजनक दावे केले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना नियोजित पद्धतीने आणले जात असल्याचा आरोप केला.
फडणवीस यांच्या दाव्यानुसार, कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या सुमारे 90 ते 95 टक्के मुली या काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजशी संबंधित आहेत. इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी आणले जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कार्यक्रमाच्या सोशल मीडिया प्रमोशनबाबतही फडणवीस यांनी गंभीर आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना कार्यक्रम आणि राहुल गांधी यांच्याबाबत केवळ सकारात्मक कंटेंट प्रकाशित करण्यास सांगण्यात आले आहे. सकारात्मक पोस्ट केल्यासच पैसे दिले जातील, तर नकारात्मक कंटेंट टाकल्यास पैसे मिळणार नाहीत, अशी अट असल्याचा दावा त्यांनी केला.
भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याचा आरोप केला होता. कार्यक्रमासाठी हजारो लोकांवर मोठा खर्च करण्यात येत असून, एकूण खर्च कोट्यवधी रुपयांपर्यंत असल्याचा दावा त्यांनी केला.
याबाबत बोलताना फडणवीस यांनी बन यांनी केलेल्या आरोपांची पुराव्यांच्या आधारे पडताळणी केली जाईल, असे स्पष्ट केले. कार्यक्रमासाठी वापरल्या जाणाऱ्या निधीच्या स्रोतावरूनही काँग्रेसकडून स्पष्टीकरण मागितले जात आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ABVP आणि NSUI कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. कार्यक्रमाच्या आदल्या रात्री झालेल्या या वादानंतर काही जणांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
या कारवाईवर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला असून, केवळ आपल्या कार्यकर्त्यांवर कारवाई करून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याभोवतीचा राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.






