
सचिन अहिर यांनी का सोडली ठाकरे गटाची साथ? राजकीय निर्णयामागची 'ही' कारणे चर्चेत
विधान परिषदेत ठाकरे गटाचे एकूण सहा आमदार होते, मात्र आता सचिन अहिर शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटात फक्त पाच आमदार उरले आहेत. दरम्यान या सगळ्यानंतर आता सचिन अहिर यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत कारवाई होणार की नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे.
राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, गेल्या काही महिन्यांपासून सचिन अहिर पक्षातील त्यांच्या भूमिकेबाबत अस्वस्थ होते. विधान परिषदेतील जबाबदाऱ्या, आगामी राजकीय संधी आणि पक्षातील स्थान याबाबत त्यांनी वेगळी भूमिका घेतल्याचे बोलले जात होते. त्याचवेळी सत्ताधारी महायुतीकडून त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याची तयारी सुरू होती.
विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी सुरुवातीला नीलम गोऱ्हे आणि कृपाल तुमाने यांच्या नावांची चर्चा होती. मात्र ऐनवेळी महायुतीने सचिन अहिर यांना उमेदवारी दिली. ही संधी स्वीकारत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासाला नवे वळण मिळाल्याचे मानले जात आहे.
सचिन अहिर हे मुंबईतील प्रभावी नेत्यांपैकी एक मानले जातात. ते यापूर्वी वरळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. २०१९ मध्ये आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती. आता त्यांच्या पक्षांतरामुळे मुंबईतील ठाकरे गटाच्या संघटनात्मक ताकदीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सचिन अहिर यांच्या उमेदवारीनंतर मंत्री संजय शिरसाट यांनी, “सचिन अहिर हे शिवसेनेचेच आमदार होते. आम्ही एका शिवसैनिकाला न्याय दिला आहे,” असे म्हणत त्यांच्या निर्णयाचे समर्थन केले. तसेच मंत्री उदय सामंत यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच अहिर यांनी उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्याचे स्पष्ट केले.
सचिन अहिर यांच्या निर्णयामुळे ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि राज्याच्या राजकारणात त्याचे परिणाम दिसू शकतात. महायुतीने ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत विरोधी गटातील नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्याची रणनीती अधिक आक्रमक केल्याचेही या घडामोडीतून स्पष्ट होत आहे. उपसभापतीपदाच्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
BJP Politics : भाजप पक्षसंघटनेतही होणार मोठे फेरबदल; अडवाणी, जोशींना मिळणार डच्चू?