
Shambhuraj Desai News
Sambhuraj Desai on Sangali Politics : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना शिवसेनेची भूमिका ठरवणारा भाजप कोण, असा थेट सवाल राज्याचे पर्यटनमंत्री तथा शिवसेनेचे नेते शंभूराजे देसाई यांनी केला. महापालिका निवडणुकीवेळी भाजपने फसवणूक केल्याचा आरोप करत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देसाई म्हणाले, महापालिका निवडणुकीत भाजपने दहा जागा देण्याचे जाहीर केले होते; मात्र शेवटी ‘सॉरी’ म्हणत केवळ दोन जागा दिल्या. “एक लुगड्याने बाई म्हातारी होत नसते,” असा टोला लगावत निवडणूक निकालानंतर भाजपला वास्तव कळाले, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जमेल तिथे महायुती, अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय ठरलेला असतानाही भाजपने शब्द पाळला नाही, असा आरोप त्यांनी केला.
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सांगलीत सत्ता स्थापनेबाबत पेच निर्माण झाला आहे. बहुमतासाठी महाविकास आघाडीला एका जागेची गरज असून भाजपलाही १३ जागांची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेत महायुतीचीच सत्ता येईल, तसेच शिवसेना (शिंदे गट) सोबत सहभागी असेल, असा दावा केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना देसाई यांनी स्पष्ट केले की, “भाजपची भूमिका सोयीस्कर असली म्हणून आमची भूमिका ते ठरवू शकत नाहीत.”
महापालिकेत सत्तेत सहभागी व्हायचे की नाही, तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये कोणती भूमिका घ्यायची याबाबत नव्याने निवडून आलेल्या सदस्यांशी चर्चा केली जाणार आहे. या चर्चेचा सविस्तर अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला जाईल. अंतिम निर्णय त्यांच्याच मार्गदर्शनानुसार घेतला जाईल, असे देसाई यांनी सांगितले.
कॉन्स्टेबलचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा; कपडे काढून उपनिरीक्षकाला केली मारहाण
निवडणुकीदरम्यान भाजपकडून कसा त्रास देण्यात आला, याचाही वृत्तांत पक्षप्रमुखांना दिला जाईल. दरम्यान, देसाई यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या सात सदस्यांचा आणि १९ पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, महानगर प्रमुख प्रा. मोहन वनखंडे, गौरव नायकवडी, नगरसेवक युवराज बावडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. सांगलीतील राजकीय घडामोडींना देसाई यांच्या वक्तव्यामुळे नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.