मराठा आरक्षणावरून राधाकृष्ण् विखे पाटील यांचे मोठे विधान
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापत असल्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा आंदोलनातील एक प्रमुख व्यक्तिमत्व असलेले मनोज जारंगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात पत्रकार परिषद घेत, जिथे आंदोलनाची नवी तारीख आणि भविष्यातील रणनीती जाहीर केली आहे. यावेळी 30 मे 2026 रोजी आंदोलन करणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली. तसेच हजारोंच्या संख्येनं येण्याचे आंदोलकांना आवाहन केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शांततेत आंदोलन सुरु राहील, असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
अहिल्यानगरच्या दौऱ्यात राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “मराठा आरक्षण उपसमितीचा अध्यक्ष झाल्यावर हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीची सुरुवात मी केली. आपण अडीच लाख कुणबी दाखले दिलेले आहेत. मराठा आरक्षणविषयक उपसमितीचा अध्यक्ष म्हणून मी सर्व आमदारांना पत्रं पाठवली आहेत. स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी स्थानिक आमदारांनी प्रयत्न करायला हवेत. सातारा गॅजेटची प्रक्रिया आम्ही आता सुरु केली आहे. त्याची अंमलबजावणी अजून सुरु झाली नाही हे मान्य करतो मात्र प्रक्रिया सुरु आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “आतापर्यंत आपण मराठा आरक्षणासंदर्भात जे काही निर्णय घेतले त्यांना कुठल्याही न्यायालयाने स्थगिती दिली नाही. आंदोलनादरम्यान निधन झालेल्या मराठा आंदोलकांच्या मुलांना नोकरीमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. एसटी महामंडळात आम्ही त्यांना नोकरी देत होतो, मात्र त्यांनी ती स्वकारली नाही. आता महावितरण आणि एमआयडीसी मध्ये नोकरी देण्यासंदर्भात विनंती केली आहे. उपसमितीचा अध्यक्ष म्हणून माझा राजीनामा दिल्याने जरंगे पाटलांचं समाधान होत असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे,” असे ते यावेळी म्हणाले.
“देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळं केलं,” मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील पुन्हा भडकले!






