
Maharashtra Politics : हे 'ऑपरेशन टायगर' नसून 'ऑपरेशन गिधाड'; काँग्रेस नेते नाना पटोलेंचा टोला
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेला ऑपरेशन टायगरमुळे मोठा फटका बसला आहे. असे असताना आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी शिवसेना शिंदे गटाच्या कथित ‘ऑपरेशन टायगर’वर जोरदार टीका करत हे ‘ऑपरेशन टायगर’ नसून ‘ऑपरेशन गिधाड’ असल्याचा आरोप केला. सत्तेसाठी सुरू असलेली ही राजकीय तोडफोड लोकशाहीसाठी घातक असल्याचे सांगत त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला.
नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे गटातील खासदारांना फोडण्यासाठी केवळ २५ कोटी रुपयेच नव्हे तर त्यापेक्षाही अधिक रकमेचा वापर झाला असावा. सत्तेचा हव्यास किती असावा, यालाही काही मर्यादा आहे की नाही? सध्या सुरू असलेला हा सारा प्रकार जनता उघड्या डोळ्यांनी पाहत असल्याचे ते म्हणाले. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये पक्ष फोडण्याचे काम केंद्रातील सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
ठाकरे यांचे खासदार दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा राजकारणामुळे जनतेचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास उडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनीदेखील सहकाऱ्यांना ‘ज्यांना जिथे जायचे आहे, त्यांनी जावे’ अशी भूमिका घेतल्याचे सांगत पटोले म्हणाले, लोकशाहीला कमकुवत करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. ठाकरे गटातील खासदार वेगळा गट स्थापन करतील, असे चित्र निर्माण केले जात आहे. ‘मोदी है तो मुमकिन है’ या धर्तीवर सर्व काही शक्य केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
आमचे खासदार फोडणे शक्य नाही
काँग्रेसच्या खासदारांशी कोणताही संपर्क साधला गेला नसून काँग्रेसचे खासदार फोडणे शक्य नाही, असा दावा त्यांनी केला. एकनाथ शिंदे यांची ताकद सध्या वाढत असल्याचे दिसत असले तरी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप त्यांची राजकीय हवा काढेल, असे भाकित पटोले यांनी व्यक्त केले. राजकीय घडामोडींव्यतिरिक्त राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही त्यांनी चिंता व्यक्त केली.
पिण्याच्या पाण्याचे संकट गंभीर
देशातील अनेक भागांत पावसाने दडी मारली आहे. पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. आता हे सर्व कोणाच्या हातात नसून देवाच्या हातात असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली.