
6 खासदार सोडणार उद्धव ठाकरेंची साथ?
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही खासदार फुटणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पक्षाच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून त्यामुळे ठाकरे गटाची चिंता वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित खासदारांपैकी दोन खासदार आधीच दिल्लीत पोहोचले असून आणखी चार खासदार आज रात्री दिल्लीत दाखल होणार असल्याची चर्चा आहे. हे सर्व खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या शक्यता वर्तवल्या जात असल्याचे सांगितले जात आहे. यातच हि फुटी रोखण्यासाठी खासदार अनिल देसाई आणि संजय राऊत यांनी दिल्ली गाठली असून संभाव्य बंड रोखण्यासाठी ते प्रयत्न करत असल्याचे समजत आहे.
राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांनुसार, हे खासदार प्रथम स्वतंत्र संसदीय गट स्थापन करू शकतात. त्यानंतर हा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, यासंदर्भात शिवसेनेच्या इतर नेत्यांकडून आणि ठाकरे गटाच्या कोणत्याही खासदारांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा पुन्हा सुरू झाली असून ठाकरे गटातील काही लोकप्रतिनिधी शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे दावे सातत्याने केले जात आहेत.
संभाव्य फुटीच्या चर्चांनंतर ठाकरे गटाकडूनही हालचालींना वेग आला आहे. पक्षातील खासदारांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वरिष्ठ नेते सक्रिय झाल्याचे समजते. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अनिल देसाई आणि खासदार संजय राऊत हे देखील दिल्लीत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. संभाव्य बंड रोखण्यासाठी आणि खासदारांशी संवाद साधण्यासाठी ही भेट असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच या 9 खासदारांबरोबर उद्धव ठाकरे यांची बैठक पार पडली होती. आता या संभाव्य फुटीमुळे ठाकरे गटात चिंतेचे वातावरण आहे.
येत्या काही दिवसांत शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. अशा वेळी खासदार फुटीच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे. जर या चर्चांमध्ये तथ्य आढळले, तर ठाकरे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जाऊ शकतो. दरम्यान, सध्या या सर्व घडामोडी राजकीय चर्चांच्या पातळीवर असून कोणताही अधिकृत निर्णय किंवा घोषणा झालेली नाही.
प्रताप सरनाईक यांनी पक्षप्रवेशावर भाष्य करत म्हंटले कि, “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्यकर्ते, शिवसैनिक, नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार यांना पक्षात प्रवेश करायचा असेल तर त्यांच्यासाठी 24 तास 365 दिवस दरवाजे खुले आहेत. आजही एकनाथ शिंदे रात्री दोन वाजेपर्यंत काम करतात. त्यांची काम करण्याची पद्धत जर आवडत असेल आणि त्यांना पक्षात प्रवेश करायचा असेल तर आम्ही त्यांच्या स्वागताला तयार आहोत,” असे ते म्हणाले.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संपर्कात असल्याच्या चर्चांवर बोलताना ते म्हणाले, “याबाबत मला माहिती नाही. मात्र मला वाटत कि प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात विकास झाला पाहिजे. ज्यांना आमच्या विचारधारेवर आणि एकनाथ शिंदेंवर विश्वास आहे, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याची मनात इच्छा असेल तर त्यांचं स्वागत आहे. त्यांच्यासाठी 24 यास 365 दिवस दरवाजे उघडे आहेत,” असे ते म्हणाले.