
विजय वडेट्टीवारांचा मनोज जरांगेंना इशारा, ओबीसी आरक्षणावरून आक्रमक भूमिका
राज्य सरकारच्या वतीने काही दिवसांपूर्वी तीन मंत्र्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन उपोषण न करण्याची विनंती केली होती. मात्र, आपल्या मागण्यांवर ठाम राहत जरांगे यांनी आंदोलनाचा निर्णय कायम ठेवला. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसींच्या वाट्याचे आरक्षण इतरांना देऊ नये, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. वडेट्टीवार म्हणाले की, आरक्षण द्यायचे असेल तर सरकारने त्यासाठी वेगळा मार्ग काढावा. ओबीसी समाजाच्या वाट्याला धक्का न लावता आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे. ‘जरांगेंच्या नादाला लागायचं ते ज्याचं त्याचं; मात्र ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये,’ असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी वडेट्टीवार यांनी आणखी एक दावा केला. अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, सध्या वातावरण संवेदनशील असल्याने संबंधितांची नावे जाहीर करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परिस्थिती शांत झाल्यानंतर नावे सांगू, असेही ते म्हणाले.
दरम्यान, भाजपचे तिरोडा-गोरेगावचे आमदार विजय रहांगडाले यांनीही मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर टीका केली आहे. जरांगे यांचे आंदोलन स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आणि स्वतःचे नाव मोठे करण्यासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यांच्या आंदोलनाचा उद्देश भाजप नेत्यांना लक्ष्य करणे आणि त्यांच्यावर टीका करणे एवढाच राहिला असल्याचे रहांगडाले यांनी म्हटले.
दरम्यान, गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. जरांगे यांच्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीकडे राजकीयदृष्ट्याही महत्त्वाने पाहिले जात आहे.
जरांगे यांच्या उपोषणाला सुरुवात झाल्यानंतर सरकारची भूमिका काय राहते आणि मराठा तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पुढील घडामोडी कशा घडतात, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.