
(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)
गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्केल यांनी सराव सत्रादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अभिषेक शर्माची बाजू सावरली. मोर्केल यांनी स्पष्ट केलं की, ‘उद्याचा दिवस अभिषेकसाठी एक नवीन सुरुवात असेल. त्याच्याकडे आपली क्षमता सिद्ध करण्याची ही सुवर्णसंधी आहे. त्याने याच मैदानावर यापूर्वी इंग्लंडविरुद्ध शतक झळकावलं आहे. त्यामुळे तो या मॅचमध्ये चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे.’
या विधानावरून हे स्पष्ट होते की, संघ व्यवस्थापन आजही अभिषेकच्या आक्रमक खेळावर विश्वास ठेवून आहे आणि त्याला सेमीफायनलसारख्या मोठ्या सामन्यातून वगळण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही.
अभिषेक शर्माला पाठिंबा मिळाल्यामुळे संजू सॅमसनला पुन्हा एकदा बेंचवर बसावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संजू सॅमसनचे चाहते त्याला सलामीला किंवा मधल्या फळीत खेळवण्याची मागणी करत होते. मात्र, अभिषेकला ‘बॅक’ करण्याच्या कोचच्या निर्णयामुळे संजूला या ऐतिहासिक सामन्यात बाहेरच राहावे लागण्याचे संकेत मिळत आहेत. वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत त्याने 97 धावांची दमदार खेळी केली होती. पण तरीही सेमीफायनल सामन्यात त्याला संघात जागा मिळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.
वानखेडे स्टेडियमवर अभिषेक शर्माने याआधी इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली होती. हीच बाब लक्षात घेऊन प्रशिक्षकांनी त्याला आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे. इंग्लंडच्या वेगवान आक्रमणाविरुद्ध अभिषेकची आक्रमक सुरुवात भारतासाठी गेमचेंजर ठरू शकते, असे व्यवस्थापनाला वाटते. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरी सेमीफायनल 5 मार्च 2026 रोजी वानखेडे स्टेडियम, मुंबईमध्ये खेळण्यात येणार आहे. कोचने अभिषेक शर्माला संघात कायम ठेवण्याचे संकेत दिल्यानंतर आता संघात वेगळा काय ट्विस्ट येईल हा मोठा प्रश्नच आहे. आता चेंडू अभिषेक शर्माच्या कोर्टात आहे. प्रशिक्षकांनी दाखवलेला हा विश्वास तो सार्थ ठरवणार की पुन्हा एकदा स्वस्तात बाद होऊन टीकाकारांच्या निशाण्यावर येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भारत आणि इंग्लंड गेल्या दोन वेळा T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळले आहेत . हा सामना सलग तिसऱ्या T20 विश्वचषकाचा उपांत्य सामना म्हणून खेळला जात आहे. 2022मध्ये, भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीतही खेळले होते. ज्यात इंग्लंड टीमने विजय मिळवला होता. 2024 मध्ये, भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीतही खेळले होते. ज्यात भारतीय टीमने विजय मिळवला होता. त्यामुळे यावेळीही हा सामना हाय-व्होल्टेज असणार आहे.