Tamim Iqbal on IND vs BAN series
बांग्लादेशमध्ये भारताविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका आयोजित होणार होती, परंतु सध्या राजकीय संबधातील तणावामुळे ही मालिका पुढे ढकलण्यात आली. परंतु, तमीम इक्बालने स्पष्ट केले की भारत-बांग्लादेश मालिका पूर्णपणे रद्द झालेली नाही. तमीम इक्बालने सांगितले की, बांग्लादेश क्रिकेट बोर्ड (BCB) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) दोन्ही ही मालिका आयोजित करण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. त्याने पुढे सांगितले की, दोन्ही मंडळे आता मालिकेसाठी नवीन विंडो शोधण्याकरिता एकत्र काम करत आहेत. तमीमच्या म्हणण्यानुसार, ही मालिका ऑगस्ट-सप्टेंबर या नियोजित कालावधीत होणार नाही, तर ती पुढे ढकलण्यात आली आहे.
तमीम इक्बाल ‘नॉट आऊट नोमान’ या क्रीडा मंचावर सांगितले की, बांग्लादेश आणि भारत या दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड ही मालिका आयोजित करण्याबाबत गंभीर आहेत आणि त्यासाठी एका नवीन संधीच्या शोधात आहेत. त्यांनी सांगितले की, बीसीबीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे, परंतु काही गोष्टी त्यांच्या नियंत्रणाबाहेर आहेत आणि बोर्डाचे अध्यक्ष म्हणून त्यांना आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडायची नाही. दोन्ही देशांचे क्रिकेट वेळापत्रक व्यस्त आहे. बांग्लादेशच्या तीन आगामी मालिका आहेत आणि भारतीय संघाचे वेळापत्रकही खूप व्यस्त आहे. असे असूनही, दोन्ही बोर्ड मालिकेसंदर्भात एकमेकांच्या सतत संपर्कात आहेत.
भारतात टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा आयोजित केली होती. बांग्लादेश आपले सर्व सामने भारतात खेळणार होता. परंतु, अचानक सुरक्षेच्या कारणास्तव, बांग्लादेशने आपले सामने श्रीलंकेत हलवण्याचा प्रस्ताव आयसीसीकडे ठेवला. मात्र, वेळापत्रक आधीच जाहीर झाल्यामुळे, आयसीसीने बांग्लादेशची विनंती फेटाळली. त्यानंतर बांग्लादेशने भारतात न जाण्याचा निर्णय घेतला आणि टी२० विश्वचषक २०२६ मधून माघार घेतली.
आयपीएल २०२६ च्या संघातून मुस्तफिजुर रहमानला वगळल्यानंतर हा मुद्दा समोर आला. बीसीसीआयच्या आदेशानुसार केकेआरने त्याला संघातून मुक्त केले होते. या निर्णयामुळे बीसीबी खूप नाराज झाली होती. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले. यानंतर, भारताने त्यावेळी बांग्लादेशचा दौरा केला नाही.






