बीसीसीआयने एक अधिकृत निवेदन जारी करत म्हटले की, ‘बीसीसीआयला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, साईराज बहुतुले यांची भारतीय क्रिकेट संघाच्या (वरिष्ठ संघाच्या) फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.’ ६ जूनपासून न्यू चंदीगड येथे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना येथे खेळवला जाणार आहे. हा सामना बहुतुले यांचा भारतीय संघासोबतचा पहिला अधिकृत दौरा असेल.
🚨 News 🚨 BCCI appoints Sairaj Bahutule as India’s Spin Bowling Coach. More Details 🔽 | #TeamIndiahttps://t.co/DYgHNIX7E5 — BCCI (@BCCI) June 2, 2026
नियुक्तीनंतर साईराज बहुतुले यांनी आनंद व्यक्त करत भारतीय क्रिकेटसाठी योगदान देण्याची ही मोठी संधी असल्याचे म्हटले. बहुतुले म्हणाले, ‘भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती होणे, हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. एक खेळाडू म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब होती, आणि आता पुन्हा एकदा प्रशिक्षणाच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटमध्ये योगदान देण्याची संधी मिळाली, हे माझ्यासाठी खूप खास आहे. मी खेळाडूंसोबत काम करण्यास आणि संघाला सर्व फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी योगदान देण्यास उत्सुक आहे.’
क्रिकेट कारकिर्दीनंतर साईराज बहुतुले यांनी अनेक संघासाठी प्रशिक्षक म्हणूनही प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांनी विदर्भ, केरळ, गुजरात आणि बंगाल या संघांचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले. तसेच त्यांनी आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्जसारख्या संघांमध्ये स्पिन बॉलिंग कोच म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. बहुतुले हे २०२२ मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते आणि २०२४ च्या विश्वचषकातही ते कोचिंग स्टाफचा भाग होते. त्यांनी इंडिया ‘अ’ आणि वरिष्ठ पुरुष संघांसाठी विशेषज्ञ गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. बहुतुले हे २०२१ ते २०२४ या काळात बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (सेंटर ऑफ एक्सलन्स) येथील कोचिंग स्टाफचे एक प्रमुख सदस्य होते.
हे भारताचे माजी खेळाडू असून देशांतर्गत क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक मानले जातात. साईराज बहुतुले यांनी भारतासाठी दोन कसोटी आणि आठ एकदिवसीय सामने खेळले आहेत. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी मोठे नाव कमावले. त्यांची प्रथम-श्रेणी कारकीर्द जवळपास दोन दशकांची होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी ६१७६ धावा आणि तब्बल ६३० विकेट्स घेतल्या आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा भारतीय संघातील युवा फिरकीपटूंना होणार असल्याचे मानले जात आहे.
IPL 2027 पूर्वी ‘या’ संघाच्या कर्णधारांचा होणार गेम; टीम मॅनेजमेंट ॲक्शन मोडमध्ये






