
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
आता, गौतम गंभीरने या संपूर्ण प्रकरणावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. गंभीर म्हणाला, “या प्रश्नाचे उत्तर देण्याचीही गरज नाही. हा संपूर्ण देशासाठी एक मोठा क्षण आहे आणि आपण हा ऐतिहासिक विजय साजरा केला पाहिजे. असे मुद्दे उपस्थित करण्यात काहीही अर्थ नाही. कारण त्यामुळे संघाच्या कामगिरीत उत्साहावर मोठा परिणाम होतो. जर तुम्हाला त्या 15 खेळाडूंच्या मेहनतीला कमी लेखायचे असेल तर उद्या कोणीही काहीही बोलू शकते.”
गंभीर पुढे म्हणाला, “हा खेळाडूंवरही अन्याय आहे. कल्पना करा की या खेळाडूंनी किती सहन केलं असेल आणि त्यांनी किती दबाव सहन केला असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर संघ प्रचंड दबावाखाली होता. अशा वेळी असं विधान करणं म्हणजे तुमच्या स्वतःच्या खेळाडूंना आणि तुमच्या स्वतःच्या संघाला कमी लेखणं आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे.”
भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला 96 धावांनी हरवून 2026 चा टी20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि जय शाह यांनी ट्रॉफी घेऊन हनुमान मंदिराला भेट दिली. याच सगळ्या प्रसंगावरुन कीर्ती आझाद यांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले की, ट्रॉफी मशीद, चर्च किंवा गुरुद्वारात का नेण्यात आली नाही. ही ट्रॉफी 1.4 अब्ज भारतीयांची आहे, जे प्रत्येक धर्माचे प्रतिनिधित्व करतात. हा कोणत्याही एका धर्माच्या विजयाचा उत्सव नाही.
या स्पर्धेत टीम इंडियाचा प्रवास सोपा नव्हता. सुपर 8मध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना बराच ताण सहन करावा लागला. पहिल्याच टप्प्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाल्यानंतर संघावर प्रचंड दबाव होता. पण भारताने जोरदार पुनरागमन केलं आणि झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजचा पराभव करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडला हरवले आणि नंतर अंतिम सामन्यात न्यूझीलंडला 96 धावांनी हरवून इतिहास रचला. या विजयासह, भारत तीन वेळा टी-20 विश्वचषक जिंकणारा पहिला संघ बनला.