भारतीय संघ(फोटो-सोशल मीडिया)
IND vs AUS ODI Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकेला रविवार, १९ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. सामने पर्थ, अॅडलेड आणि सिडनी येथे खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेपूर्वी संपूर्ण मालिकेत खेळाडूंच्या कामगिरी आणि विक्रमांची चर्चा आता रंगू लागली आहे. दोन्ही संघांमध्ये आजवर रोमांचक लढती होत आल्या आहेत. १९८० ते २०२५ पर्यंत, या दोन्ही संघांनी एकूण १५२ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये अनेक सामने संस्मरणीय राहिले आहेत. या काळात काही फलंदाजांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने इतिहास देखील रचला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पाच आघाडीच्या फलंदाजांच्या अकडेवारीवर जाणून घेऊया.
हेही वाचा : ४० वर्षीय फलंदाजाचा मोठा कारनामा! रणजी ट्रॉफीमध्ये उडवली खळबळ; रचला ३२ शतकांचा डोंगर
क्रिकेटचा ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरने १९९१ ते २०१२ दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७१ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये त्याने ४४.५९ च्या सरासरीने ३,०७७ धावा फटकावल्या आहेत. या दरम्यान त्याने ९ शतके आणि १५ अर्धशतके झळकवली आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक ३३० चौकार मारण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावर जमा आहे, जो त्याच्या आक्रमक फलंदाजीचा पुरावा आहे.
‘रन मशीन’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या विराट कोहलीने २००९ ते २०२५ दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५० एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. या दरम्यान त्याने ५४.४६ च्या सरासरीने २,४५१ धावा काढल्या आहेत. ज्यात त्याने ८ शतके आणि १५ अर्धशतके लगावली आहेत
रोहित शर्माने २००७ ते २०२५ दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या त्याने सामन्यांमध्ये ५७.३० च्या सरासरीने २,४०७ धावा काढल्या आहेत. त्याने ८ शतके आणि ९ अर्धशतके लगावली आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने सर्वात संस्मरणीय खेळी २ नोव्हेंबर २०१३ रोजी बेंगळुरू येथे खेळली होती. या खेळीत त्याने १५८ चेंडूत १६ षटकार आणि १२ चौकारांसह २०९ धावा केल्या होत्या.
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने २००६ ते २०१९ दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५५ एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. त्याने ४८ डावांमध्ये ४४.८६ च्या सरासरीने १,६६० धावा फटकावल्या आहेत. ज्यात त्याने दोन शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. धोनीची शांत फलंदाजी आणि सामना फिनिशिंग क्षमतेमुळे त्याने अनेकवेळा भारताला अनेक विजय मिळवून दिले.