
Rajasthan Royals विकली गेली रे..! तब्बल १५,६६० कोटींना झाला फ्रँचायझीचा ताबा (Photo Credit- X)
भारतीय वंशाचे ब्रिटीश उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी जयपूरस्थित या संघाच्या खरेदीसाठी अंतिम करार पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले आहे. हा संपूर्ण व्यवहार सुमारे १.६५ अब्ज डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार १५,६६० कोटी रुपयांना झाला आहे. या नवीन मालकी हक्काच्या कन्सोर्टियममध्ये मित्तल यांच्यासोबत सिरम इन्स्टिट्यूटचे अदार पूनावाला आणि विद्यमान मालक मनोज बदाले यांचाही समावेश आहे.
🚨 BREAKING Lakshmi Mittal has announced the acquisition of Rajasthan Royals franchise. Adar Poonawalla and Manoj Badale are part of the consortium that has acquired the franchise for $1.65 billion. pic.twitter.com/MiZ5piwzrP — Cricbuzz (@cricbuzz) May 3, 2026
‘क्रिकबझ’ने दिलेल्या वृत्तानुसार, या करारानंतर मित्तल कुटुंबाकडे राजस्थान रॉयल्सची सर्वाधिक म्हणजेच ७५ टक्के हिस्सेदारी असेल. अदार पूनावाला यांच्याकडे १८ टक्के वाटा असेल, तर उर्वरित ७ टक्के हिस्सा जुन्या गुंतवणूकदारांकडे राहील. विशेष म्हणजे, मनोज बदाले हे संघाचे मार्गदर्शक म्हणून आपली जबाबदारी कायम ठेवणार आहेत.
या अधिग्रहणांतर्गत केवळ आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सच नाही, तर दक्षिण आफ्रिकेतील ‘पार्ल रॉयल्स’ आणि कॅरेबियन प्रीमिअर लीग मधील ‘बारबाडोस रॉयल्स’ या संघांचाही समावेश आहे. बीसीसीआय (BCCI) आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या अधिकृत मंजुरीनंतर २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत हा व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे.
लक्ष्मी मित्तल यांचा जन्म राजस्थानमधील सादुलपूर गावात झाला असल्याने ही डील त्यांच्यासाठी भावनिकदृष्ट्याही महत्त्वाची आहे. “माझे कुटुंब राजस्थानचे आहे, त्यामुळे आयपीएलमध्ये या संघाचा भाग होण्यापेक्षा दुसरा मोठा आनंद नाही,” अशा भावना मित्तल यांनी व्यक्त केल्या आहेत. शालेय जीवनापासून क्रिकेटचे चाहते असलेल्या मित्तल यांनी राजस्थान रॉयल्सच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि चाहत्यांसोबत मैदानात उतरण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे म्हटले आहे.
२००८ मध्ये आयपीएलचे पहिले जेतेपद पटकावणारा राजस्थान रॉयल्स हा संघ सध्या २०२६ च्या हंगामातही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. वैभव सूर्यवंशी यांसारख्या तरुण खेळाडूंच्या चमकदार कामगिरीमुळे संघ फॉर्मात असतानाच, मित्तल यांच्यासारख्या बड्या नेतृत्वाचा पाठिंबा मिळाल्याने राजस्थान रॉयल्सच्या एका नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. मजबूत आर्थिक पाठबळामुळे आगामी काळात हा संघ यशाची नवनवी शिखरे सर करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
चला पॅकअप करा! साधं जिंकताही आलं नाही; CSK ने MI ला चारली धूळ, प्ले ऑफचं स्वप्न भंगलं