विराट कोहली(फोटो-सोशल मिडिया)
PBKS vs RCB Final Match : आयपीएल २०२५ चा अंतिम सामना आज म्हणजेच ३ जून रोजी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आज ७.३० वाजता सुरू होणार आहे. याआधी विराट कोहलीच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. आयपीएलच्या सुरुवातीपासूनच विराट कोहली आरसीबीशी जोडला गेला आहे. त्याने आरसीबीकडून खेळताना अनेक विक्रम देखील केले आहेत.
या हंगामात देखील विराट कोहलीने आरसीबीसाठी फलंदाजीतील सातत्य दाखवत शानदार कामगिरी केली आहे. त्याच वेळी, अंतिम सामन्यात त्याला इतिहास रचण्याची संधी चालून आली आहे. कोहली हा एक भीम पराक्रम करण्यापासून फक्त ८६ धावा दूर आहे.
आयपीएल २०२५ चा हंगाम विराट कोहलीसाठी चांगला राहीला आहे. ज्यामुळे आरसीबी चाहते त्याच्याकडून अंतिम सामन्यात मोठी खेळीची अपेक्षा बाळगून आहेत. या हंगामातील १४ डावांमध्ये त्याने एकूण ६१४ धावा केल्या आहेत. या दरम्यान, त्याने आठ अर्धशतके लागावली आहेत. आता तो एका हंगामात ७०० धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी त्याला ८६ धावांची गरज आहे.
विराट कोहलीने पंजाब किंग्जविरुद्धच्या जेतेपदाच्या सामन्यात ८६ धावा केल्या तर तो तीन वेगवेगळ्या आयपीएल हंगामात ७०० पेक्षा जास्त धावा करणारा जगातील पहिला खेळाडू बनू शकतो. विराट कोहलीने यापूर्वी आयपीएल २०१६ मध्ये ९७३ आणि आयपीएल २०२४ मध्ये ७४१ धावा केल्या होत्या. याशिवाय कॅरिबियन खेळाडू ख्रिस गेलने २०१२ आणि २०१३ च्या आयपीएल हंगामात दोन वेळा सलग ७०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
आरसीबी आयपीएल २०२५ मध्ये चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी, त्यांनी आयपीएल २००९, आयपीएल २०११ आणि आयपीएल २०१६ मध्ये आयपीएलचा अंतिम सामन्यात धडक मारली होती. परंतु तिन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याच वेळी, यावेळी आरसीबीला कोणत्याही परिस्थित आजचा सामना जिंकावा लागणार आहे. जर यावेळी अंतिम सामना जिंकला तर आरसीबी १७ वर्षांनंतर पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद नावावर करणार आहे.
हेही वाचा : फलंदाजी बेतली जिवावर! क्रिकेट मैदानावरच १२ वर्षांच्या मुलाचा करूण अंत, वाचा सविस्तर..
आयपीएलच्या इतिहासात आरसीबी आणि पंजाब किंग्ज एकूण ३६ वेळा एकमेकांविरुद्ध आमनेसामने आले आहेत. या दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १८ वेळा सामना जिंकला आहे. तर पंजाब किंग्जने त्याच १८ सामन्यांमध्ये विजय आपल्या नावे केला आहे. म्हणजेच, दोन्ही संघ हेड टू हेडमध्ये समान आहेत. आयपीएल २०२५ मध्ये आरसीबी आणि पीबीकेएस एकूण तीन वेळा समोरासमोर भिडले आहेत. यामध्ये पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जने बंगळुरूचा ५ विकेट्सने पराभव केला होता. तर त्यानंतरच्या दोन सामन्यांमध्ये आरसीबीने पंजाबचा पराभव केला आहे.