कपिल देव यांच्यानंतर रवींद्र जडेजा आता कसोटी क्रिकेटमध्ये ४,००० पेक्षा जास्त धावा आणि ३५० विकेट्स घेणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. हा पराक्रम करणारा तो जगातील चौथा खेळाडूही ठरला आहे. कपिल देव यांनी १३१ कसोटी सामन्यांमध्ये ५,२४८ धावा केल्या आणि ४३४ विकेट्स घेतले. या यादीत डॅनियल व्हेटोरी दुसऱ्या क्रमांकावर असून, त्याने ११३ कसोटी सामन्यांमध्ये ४,५३१ धावा केल्या आहेत आणि ३६२ विकेट्स घेतले आहेत.
१०२ कसोटी सामन्यांमध्ये ५,२०० धावा आणि ३८३ विकेट्स घेऊन इयान बोथम तिसऱ्या स्थानावर आहे. तर, रवींद्र जडेजाने ९० कसोटी सामन्यांमध्ये ४,१०८ धावा आणि ३५० विकेट्स मिळवून या यादीत चौथे स्थान पटकावले आहे. रवींद्र जडेजाने या सामन्यात २५ चेंडूंमध्ये १३ धावा केल्या. त्यानंतर त्याने १९ षटकांत ५७ धावा देऊन २ विकेट्स घेतले आहेत. तो कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे.
जडेजाने ३५० विकेट्सचा टप्पा गाठून भारतीय कसोटी क्रिकेटमधील एका विशेष यादीत स्थान मिळवले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ३५० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा तो पाचवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. या यादीत अनिल कुंबळे ६१९ विकेट्ससह अव्वल स्थानी आहे. त्याच्यापाठोपाठ रविचंद्रन अश्विन ५३७, कपिल देव ४३४ आणि हरभजन सिंग ४१७ कसोटी विकेट्ससह आहेत. आता जडेजानेही आपल्या नावावर ३५० विकेटची नोंद केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ३५० विकेट्स घेणारा जडेजा हा जगातील केवळ तिसरा डावखुरा फिरकी गोलंदाज आहे.
३७ वर्षीय रवींद्र जडेजाने आतापर्यंत ९० कसोटी सामन्यांमध्ये ४१०८ धावा केल्या असून ३५० विकेट्स घेतले आहेत. त्याने २१० एकदिवसीय सामन्यांमध्ये २९०५ धावा केल्या असून २३२ विकेट्स घेतले आहेत. तसेच, त्याने ७४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५१५ धावा केल्या असून ५४ विकेट्स घेतले आहेत.