
पराभवानंतर श्रेयस अय्यर निराश आणि संतप्त दिसत होता , पण भारतीय कर्णधाराने पराभवासाठी कोणत्याही एका खेळाडूला दोष देण्यास स्पष्टपणे नकार दिला. एका क्षणी, १६ षटकांत इंग्लंडची धावसंख्या ५ विकेट्स गमावून १४२ होती आणि भारत विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता. पण त्यानंतर सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटले.
कर्णधार श्रेयस अय्यरने १७ वे षटक रवी बिश्नोईकडे सोपवले . षटकाची सुरुवात नो-बॉलने झाली, ज्यानंतर जेकब बेथेलने फ्री हिटवर षटकार ठोकला. त्यानंतर बिश्नोईने पुन्हा नो-बॉल टाकला. बेथेलने याचा पुरेपूर फायदा घेतला आणि संपूर्ण षटकात एकापाठोपाठ एक मोठे फटके मारले. इंग्लंडने या षटकात २९ धावा करून सामन्याचे पारडे पूर्णपणे आपल्या बाजूने फिरवले.
श्रेयस अय्यर म्हणाला की, त्याला पराभवासाठी कोणत्याही एका खेळाडूला दोष द्यायचा नाही. श्रेयस म्हणाला की, ‘सामना आपल्या हातून कुठे निसटला हे आपल्या सर्वांना माहीत आहे, पण मला कोणत्याही एका खेळाडूवर बोट दाखवायचे नाही. पहिल्या नो-बॉलनंतर रवी पुनरागमन करेल असा मला विश्वास होता. हो, १७ व्या षटकामुळे आम्हाला फटका बसला, पण ते त्यातून शिकतील. खेळपट्टीवर चेंडू ज्याप्रकारे बाउन्स करत होता, त्या हिशोबाने १९० ही एक शानदार धावसंख्या होती. पहिल्या १५ षटकांपर्यंत सामन्यावर आमचे पूर्ण वर्चस्व होते, पण त्यानंतर जेकब बेथेलने उत्कृष्ट फलंदाजी केली.’
श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघाला अद्याप एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना जिंकता आलेला नाही . आयर्लंड दौऱ्यावरील दोन्ही टी२० आंतरराष्ट्रीय सामने भारताने गमावले. त्यानंतर, इंग्लंड दौऱ्यावरील पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना पावसामुळे रद्द झाला. आता, भारतीय संघ मँचेस्टर टी२० आंतरराष्ट्रीय सामना हरला आहे. श्रेयसच्या नेतृत्वाखाली भारताने चारपैकी ३ सामने हरले आहे.या विजयामुळे इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
IND Vs ENG Live: श्रेयस अय्यरचं कॅप्टन्सीचं ग्रहण जाईना! अजून एक पराभव पदरात, इंग्लंडचा विजय