
श्रीलंका किनारपट्टीवर खळबळ! (Photo Credit- X)
श्रीलंकेच्या नौदल आणि संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या इराणी जहाजावर एकूण १८० लोक स्वार होते. पाणबुडीतून डागलेल्या टॉर्पेडोने जहाजाला लक्ष्य केले, ज्यामुळे जहाजाचा मोठा भाग समुद्रात बुडाला. आतापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून, ३२ जणांना सुखरूप वाचवण्यात नौदलाला यश आले आहे. उर्वरित ६८ जण अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी नौदलाची जहाजे आणि विमाने तैनात करण्यात आली आहेत.
https://t.co/PiqQpVIrMu pic.twitter.com/Wc1e0B0um7 — Department of War 🇺🇸 (@DeptofWar) March 4, 2026
जहाजावरून संकटकालीन संकेत मिळताच श्रीलंकेच्या नौदलाने तात्काळ बचाव पथक रवाना केले. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “इराणी जहाजाकडून तातडीचा मदतीचा संदेश प्राप्त झाला होता. त्यानंतर विनाविलंब बचाव मिशन सुरू करण्यात आले. आमचे पहिले प्राधान्य समुद्रात अडकलेल्या लोकांचे प्राण वाचवणे हे आहे.” वाचवण्यात आलेल्या ३२ जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिता हेराथ यांनी या घटनेवर अधिकृत भाष्य करताना सांगितले की, “बुडणाऱ्या जहाजावरील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचारांसाठी किनाऱ्यावर आणले गेले आहे.” या हल्ल्याचे स्वरूप पाहता श्रीलंकेने या घटनेला चोख प्रत्युत्तर देण्याचे संकेत दिले आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या हल्ल्याची जबाबदारी अमेरिकेने घेतल्याचे वृत्त समोर येत आहे. तथापि, हे व्यापारी जहाज होते की लष्करी रसद पुरवणारे जहाज, याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचे पडसाद आता श्रीलंका आणि भारतीय उपखंडाच्या समुद्रात उमटू लागल्याने संरक्षण तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
श्रीलंकेच्या सागरी हद्दीत झालेला हा हल्ला आंतरराष्ट्रीय सागरी कायद्याचे उल्लंघन असल्याचे मानले जात आहे. या हल्ल्यानंतर हिंद महासागरातील इतर व्यापारी जहाजांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या काही तासांत श्रीलंका सरकार यावर अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.