Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी 'युद्धात' अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
दक्षिण आशियातील भू-राजकीय घडामोडी वेगाने बदलत असून पाकिस्तान (Pakistan) सध्या आपल्या अस्तित्वाच्या सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. एकीकडे देशांतर्गत आर्थिक आणि राजकीय गोंधळ उडालेला असताना, दुसरीकडे पाकिस्तान एकाच वेळी तब्बल सहा वेगवेगळ्या आघाड्यांवर युद्धासारख्या परिस्थितीत अडकला आहे. भू-राजकीय तज्ञ नितीन जे. टिकू यांनी ‘युरेशियन टाइम्स’मधील आपल्या विश्लेषणात्मक लेखात स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानची सध्याची अवस्था इतकी नाजूक बनली आहे की, सौदी अरेबियाचा अमाप पैसा किंवा तुर्कीची आधुनिक लष्करी शस्त्रेसुद्धा त्याला या विघाटनापासून वाचवू शकणार नाहीत.
गेल्या वर्षी भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानच्या संपूर्ण संरक्षण यंत्रणेची पोलखोल झाली होती. भारताने केवळ पाकिस्तानी सुरक्षा कवच भेदून हल्ल्यांच्या पहिल्याच टप्प्यात अनेक दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले नाही, तर पाकिस्तानच्या महत्त्वाच्या लष्करी पायाभूत सुविधांवर अचूक हल्ले करून मोठे नुकसान केले. उपग्रहांच्या छायाचित्रांनी देखील या नुकसानीची पुष्टी केली होती, ज्यामध्ये धावपट्टी, विमानांचे हँगर्स, कमांड-अँड-कंट्रोल सेंटर्सचा नाश आणि किमान १४ लष्करी विमानांचे झालेले नुकसान स्पष्ट दिसले होते. या कारवाईनंतर एका वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेला तरी पाकिस्तानला आपल्या उद्ध्वस्त हवाई तळांची दुरुस्ती करता आलेली नाही.
आपली हीच लष्करी आणि राजकीय कमजोरी झाकण्यासाठी पाकिस्तानने नुकतीच सौदी अरेबिया आणि तुर्कीसोबत ‘मक्का संरक्षण करारा’वर स्वाक्षरी केली आहे. या त्रिपक्षीय कराराचा मुख्य उद्देश अस्थिर मध्य-पूर्वेतील इराण आणि इस्रायलच्या वर्चस्वाला आव्हान देणे तसेच भारताला एक मजबूत संदेश देणे हा आहे. परंतु, अनेक आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते, हा करार कागदावर कितीही मजबूत दिसत असला तरी प्रत्यक्ष युद्धभूमीत किंवा पाकिस्तानच्या देशांतर्गत दलदलीत तो फारसा प्रभावी ठरणार नाही. कारण तुर्की हा आधीच नाटो (NATO) चा बलाढ्य सदस्य देश आहे आणि त्याला सुरक्षेसाठी पाकिस्तानची गरज नाही, तर सौदी अरेबियाला स्वतःच्या संरक्षणासाठी अमेरिकेची मदत अपुरी पडत असताना पाकिस्तान त्याला काय संरक्षण देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia-India Railway corridor: रशिया ते भारत जमिनीवरून जोडला जाणार व्यापार; पाकिस्तानसह ‘या’ 5 देशांमधून धावणार रेल्वे
पाकिस्तानने स्वतःभोवती सहा आघाड्यांवरील युद्धाचे जाळे विणले आहे. पहिली आणि सर्वात मोठी आघाडी म्हणजे भारत, जिथे भारताने कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून सडेतोड उत्तर देण्याचा संकल्प केला आहे. दुसरी आघाडी म्हणजे बलुचिस्तान, जिथे बलुच स्वातंत्र्यसैनिक आपल्या स्वातंत्र्यासाठी रोज सैन्यावर प्राणघातक हल्ले करत आहेत. तिसरी आघाडी खैबर पख्तुनख्वा आणि चौथी आघाडी पाकव्याप्त काश्मीर (PoK) आहे, जिथे स्थानिक जनता थेट पाक सरकार आणि सैन्याविरुद्ध रस्त्यावर उतरली आहे. पाचवी आघाडी म्हणजे अफगाणिस्तान सीमा, जिथे तालिबानसोबत रोज चकमकी सुरू आहेत आणि सहावी आघाडी म्हणजे इराण व इराण-समर्थित हौथी बंडखोर, ज्यांच्याशी पाकिस्तानने मक्का करारामुळे नाहक वैर पत्करले आहे.
दुसऱ्या बाजूला, भारताने देखील तुर्की आणि पाकिस्तानच्या या वाढत्या अक्षला अत्यंत धोरणात्मक आणि राजनैतिक मार्गाने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने तुर्कीच्या प्रतिस्पर्धी देशांशी जसे की ग्रीस, सायप्रस आणि अर्मेनिया अत्यंत मजबूत लष्करी आणि राजकीय संबंध प्रस्थापित केले आहेत. याशिवाय, भारताचे इस्रायलसोबत असलेले धोरणात्मक संबंध कोणत्याही औपचारिक कागदी करारापेक्षा कितीतरी पट अधिक सखोल आणि मजबूत आहेत. त्यामुळे पाकिस्तानने कितीही इस्लामी युती करण्याचा प्रयत्न केला तरी, भारतीय परराष्ट्र धोरणाने त्याला आधीच चारी मुंड्या चित केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण
पाकिस्तानचा सर्वात मोठा आणि संसाधन समृद्ध प्रांत असलेला बलुचिस्तान आता पूर्णपणे त्याच्या हातातून निसटला आहे. स्थानिक असंतोष, स्वातंत्र्याची तीव्र लाट आणि सैन्याकडून होणारे मानवाधिकार उल्लंघन यामुळे बलुचिस्तानमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. जर हीच परिस्थिती कायम राहिली, तर सौदी अरेबिया आणि तुर्कीने लष्करी मदत पाठवण्यापूर्वीच पाकिस्तानचे अनेक तुकड्यांमध्ये विघटन झालेले जगाला पाहायला मिळेल. अंतर्गत बंडखोरी आणि परकीय आघाड्यांवर एकाच वेळी लढण्याची क्षमता आजच्या कंगाल पाकिस्तानकडे उरलेली नाही.






