टॅरिफ तणावादरम्यान अमेरिकेने भारताला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; दोन्ही देशांमधील संबंधांना म्हटले ऐतिहासिक ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Marco Rubio Independence Day message : टॅरिफ तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताला ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी विशेष संदेश पाठवून भारत-अमेरिका संबंधांना “ऐतिहासिक, महत्त्वपूर्ण व दूरगामी” असे संबोधले. रुबियो यांनी आपल्या संदेशात लिहिले “१५ ऑगस्टच्या निमित्ताने मी अमेरिकेच्या वतीने भारतीय जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो. जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि जगातील सर्वात जुनी लोकशाही यांच्यातील मैत्री ही केवळ ऐतिहासिकच नाही तर ती इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांतता, समृद्धी व सुरक्षिततेसाठी एकत्रित दृष्टिकोनाची आधारस्तंभ आहे.”
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री यांनी औद्योगिक भागीदारीचा विशेष उल्लेख करताना सांगितले की, भारत आणि अमेरिका नवोपक्रम, तंत्रज्ञान व आर्थिक विकासाच्या माध्यमातून नवे क्षितिज गाठत आहेत. दोन्ही देशांची सहकार्य भावना केवळ व्यापारापुरती मर्यादित नसून, ती संरक्षण, ऊर्जा, अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही ठोस परिणाम घडवते आहे. रुबियो यांनी अंतराळ भागीदारीचा उल्लेख करताना स्पष्ट केले “आधुनिक काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारत आणि अमेरिका खांद्याला खांदा लावून उभे राहतील आणि आगामी पिढ्यांसाठी उज्ज्वल भविष्य घडवतील.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्पची ‘राजकीय कारकीर्द’ संपवू शकतात रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन; खळबळजनक व्हिडिओ आणि कागदपत्रे असल्याचा दावा
या शुभेच्छा अशा वेळी आल्या आहेत जेव्हा भारत-अमेरिका संबंधांमध्ये टॅरिफ आणि व्यापारी धोरणांमुळे तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर ५० टक्के कर लादण्याची घोषणा केली. यापूर्वी, पाकिस्तानसोबतच्या लष्करी संघर्षानंतर युद्धबंदीसाठी मध्यस्थी केल्याचा दावा करून ट्रम्प यांनी नवी दिल्लीला नाराज केले होते. भारताने मात्र कोणत्याही तृतीय पक्षाच्या मध्यस्थीची गरज नसल्याचे ठामपणे सांगितले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : गाझा ते सुदान… युद्धात महिलांचा शारीरिक छळ मोठ्या प्रमाणावर; संयुक्त राष्ट्रांनी सादर केला थरारक अहवाल
भारत आणि अमेरिकेतील संबंध अनेक दशकांपासून विविध टप्प्यांतून गेले आहेत. सामरिक सहकार्य, संरक्षण तंत्रज्ञान, विज्ञान संशोधन, तसेच शिक्षण क्षेत्रातील देवाणघेवाण या नात्याला बळकटी देतात. इंडो-पॅसिफिक भागात चीनच्या वाढत्या प्रभावाला तोंड देण्यासाठीही दोन्ही देशांनी सामायिक धोरण आखले आहे. यासर्व घडामोडींमध्ये रुबियो यांचा संदेश हा केवळ औपचारिक शुभेच्छा नसून, तो संबंधांमध्ये सातत्य राखण्याचा आणि मतभेद असूनही सहकार्य वाढवण्याचा संकेत आहे. भारत आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन अभिमानाने, देशभक्तीच्या उत्साहात आणि जागतिक सहकार्यातील योगदानाची जाणीव ठेवून साजरा करत आहे. अशा वेळी जगातील सर्वात जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेकडून आलेला हा संदेश भारत-अमेरिका मैत्रीचा नवा अध्याय ठरू शकतो.