मी पुण्यात वास्तव्याला असलो, तरी मूळचा ग्रामीण भागातला आहे. ग्रामीण महाराष्ट्रात साहित्यिक कार्यक्रम आणि व्याख्यानांच्या निमित्ताने माझी भ्रमंती सुरू असते. ग्रामीण महाराष्ट्रात आपले ‘मराठीपण’ उत्साहाने जपणारी असंख्य माणसे पाहायला मिळतात. ती उत्तम मराठी बोलतात. त्यांना त्यांच्या बोलींचा अभिमान असतो.
तिथे मराठी साहित्याविषयक कार्यक्रमांना, व्याख्यानांना मोठ्या संख्येने रसिक येत असतात. गावोगावी ग्रंथपदर्शन भरविणारी माणसे त्या लोकांपर्यंत जात असतात. पुण्या-मुंबईतल्या माणसांइतकी पुस्तके विकत घेण्याची ऐपत कदाचित या ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोकांकडे नसेल, पण तरीही ते त्यांच्या ऐपतीप्रमाणे पुस्तके विकत घेत असतात. हे सारे मला खूप आशादायी वाटते.
२०२० साली भारत महासत्ता होणार, हा जसा एक फुगा आहे आणि महानगरातल्या महिन्याला लाख रुपये पगार मिळविणार्या काही तरुणांकडे पाहून तो फुगविला जातो आहे, तर दुसरीकडे पदवीधर झालेल्या अनेक तरुणांना साधी नोकरीही द्यायली कुणी तयार नाही. हे स्वीकारायला कठीण असले, तरी वास्तवच आहे. मराठी जगते आहे की मरते आहे? या संदर्भातले निष्कर्ष आणि अनुमान केवळ शहरांतील मराठीच्या अवस्थेवरून आपण काढणार आहोत का, हा खरा प्रश्न आहे. शहरातली मराठी भाषेची प्रकृती ठीक नाही हे मान्य केले, तरी मराठीच्या दुरावस्थेविषयी गळे काढण्याची आवश्यकता नाही. जागतिकीकरणानंतर आणि तंत्रज्ञानाचा विस्फोट झाल्यानंतर एकूणच जागतिक जीवनशैलीत जे बदल झाले आहेत, त्याचे परिणाम त्या त्या राष्ट्रातल्या भाषा आणि संस्कृतीवरही झाले आहेत. त्यामुळे भाषा आणि संस्कृतीचा पोत बदलत असला, तरी त्या नष्ट होतील याची भीती बाळगण्याचे कारण नाही.
सुटाबुटात वावरणारी, इंग्रजीवर प्रभुत्व असणारी, तरीही संवादाच्या वेळी शुद्ध आणि स्पष्ट मराठीत आवर्जून बोलणारी कितीतरी मुले भेटतात. मराठी ब्लॉग लिहिणार्या आणि वाचणार्या तरूणांची संख्याही लक्षणीय आहे. नव्या पिढीचे भाषाप्रेम, साहित्यप्रेम आणि वाचनप्रेम नव्या पद्धतीने व्यक्त होत असेल, तर त्याचेही स्वागत करायला आपण शिकले पाहिजे. मी ज्या ज्या वेळी अनेक छोट्या- मोठ्या ग्रंथालयांना भेटी दिल्या, त्या त्या वेळी मराठी विषय घेऊन स्पर्धा परीक्षा देणारी कितीतरी मराठी आणि अमराठी मुले मला मोठ्या संख्येने दिसली. मराठी वाङ्मयाचा इतिहास आस्थेने अभ्यासताना मी त्यांना पाहिले. हे चित्र आश्वासक नाही का? आसपास एवढे सारे बदल घडत असताना मराठी भाषेच्या नावाने गळे काढणारे काय करत असतात? काळाची पावले ओळखून या बदलत्या काळात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अधिक समृद्ध व्हावी, यासाठी कोणते प्रयत्न करतात? आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे. या युगात आपली भाषा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कशी सशक्त होईल, अधिक लोकांपर्यत जाईल, या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे असताना तसे प्रयत्न का होताना दिसत नाहीत, याचेही चिंतन केले पाहिजे.
बृहन्महाराष्ट्रातील मंडळी महाराष्ट्रापासून दूर राहून आपले भाषाप्रेम आणि अस्मिता टिकवून आहेत. मध्य प्रदेशात गणेश बागदरे यांच्या पुढाकाराने आणि मध्य प्रदेश सरकारच्या साहाय्याने मराठी प्रभागाची स्थापना झालेली आहे. ‘मुक्त संवाद’सारखी संस्था अनेक दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करून नव्या पिढीची मराठीची नाळ तुटू नये यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिलेली आहे. बेळगाव, कारवारसारख्या सीमाभागात तणावाचे वातावरण असूनही ज्या दिमाखात आणि धाडसाने मराठी भाषेचे साहित्यिक कार्यक्रम होतात, संमेलने होतात, ते पाहिले की ऊर भरून येतो. हैदराबादच्या मराठी मंडळींनी तिथल्या साहित्य संस्थांच्या माध्यमातून एखाद्या पारंपरिक विद्यापीठातील नावाजलेल्या मराठी विभागाला हेवा वाटेल असे संशोधन प्रकल्प सिद्धीला नेले आहेत. या गोष्टी दिलासा देणार्या आहेत, असे वाटायला काय हरकत आहे?
गुजरातमध्ये एका साहित्यिक कार्यक्रमाच्या निमित्ताने मी गेलो होतो. माझी निवासव्यवस्था ज्यांच्याकडे होती, त्यांच्याकडे एक परदेशी पाहुणा आला होता. तो उत्तम गुजराती बोलत होता. मला आश्चर्य वाटले. मी त्यांना विचारले, ‘आपण गुजराती कुठे शिकलात?’ त्यावर तो परदेशी पाहुणा म्हणाला, ‘मी गुजराती शिकलेलो नाही. इथे आल्यानंतर इंग्रजी ते गुजराती भाषांतर कसं करायचं? वाक्यरचना कशी असते? याचे मार्गदर्शन करणारी पुस्तिका मला विमानतळावरच मिळाली. इथे कामासाठी आल्यानंतर जेवढे गुजराती बोलावे लागते, त्यासाठी ही पुस्तिका पुरेशी आहे.’ मला गुजराती भाषाप्रेमींचे कौतुक वाटले. अशी व्यवस्था मुंबई विमानतळावर उतरणार्या परदेशी नागरिकांसाठी आपण मराठीप्रेमी का करू शकत नाही? मराठीप्रेमींनी इतर भाषांचा दुःस्वास करण्यापेक्षा असे उपकार हाती घ्यायला हवेत.
मुंबईत मला एक गमतीशीर अनुभव आला. सध्या मुंबईत वास्तव्याला असलेल्या आणि उच्चभ्रू लोकांच्या सोसायटीत राहणार्या माझ्या एका बालमित्राकडे मी अनेक वर्षांनी गेलो. तो ग्रामीण भागातून आलेला आणि बिकट आर्थिक परिस्थितीशी दोन हात करीत शिकलेला. त्यामुळे शून्यातून आयुष्याची उभारणी करणार्या त्याचे कौतुकच वाटते. त्याच्या घरातले वातावरण अक्षरशः इंग्रजाळलेले होते. तो, त्याची पत्नी, मुले मराठीत बोलतच नव्हती. न राहवून मी म्हणालो, ‘अरे, आपल्या सगळ्यांना मराठी येतंय. आपण मराठीत बोलायला काय हरकत आहे?’ कसंनुसं हसत त्याची बायको म्हणाली, ‘यू नो. आम्ही फक्त भांडी घासायला येणार्या, कामवाल्या बायकांशीच मराठीत बोलतो.’ मला धक्काच बसला. आपल्या आर्थिक दर्जाच्या बाबतीत लोक नेहमीच अतिसंवेदनशील असतात. अनेकदा वरचा दर्जा गाठण्याकरिता ते मातृभाषेचा त्याग करून प्रतिष्ठित समजल्या जाणार्या दुसर्या भाषेचा स्वीकार करतात. त्यामुळेसुद्धा भाषा मरते, या पूर्वी कुठेतरी वाचलेल्या विचाराची सत्यता मला त्या दिवशी पटली.
कोणतीही भाषा समृद्ध होण्यासाठी आणि व्यवहारात तिचा अधिकाधिक वापर होण्यासाठी ती भाषा बोलणार्या भाषकांच्या मनातला न्यूनगंड दूर होणे खूप गरजेचे असते. पुणे विद्यापीठात डॉ. मनोहर जाधव मराठी विभागप्रमुख असताना त्यांनी एक चांगला प्रयोग केला होता. विद्यापीठात इतर विद्याशाखांचे शिक्षण घेणारे विद्यार्थी सुटाबुटात, टापटीप यायचे. मराठी विषय घेऊन शिकणारी मुले साध्या वेशात यायची. राहणीमानातल्या फरकामुळे अनेकदा मराठीचे विद्यार्थी बुजलेले असायचे. त्यातून त्यांच्या मनात न्यूनगंड तयार व्हायचा. तो दूर करण्यासाठी मराठीच्या विद्यार्थ्यांनीही सुटाबुटात, टापटीप यावे असा आग्रह डॉ. जाधवांनी धरला. त्याला यश आले. कपडे बदलून काय फरक पडणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतो. पण मानसिकता बदलण्यासाठी केलेला एक चांगला प्रयत्न म्हणून या प्रयोगाकडे पाहायला काय हरकत आहे?
आपल्याकडे भाषेचा संबंध ओठापुरता मर्यादित समजला जातो. भाषा ओठातून येण्यापेक्षा ती पोटातून येणे गरजेचे आहे. जेव्हा त्या भाषेत ती भाषा बोलणार्या भाषकाचे पोट भरण्याचे सामर्थ्य असेल, तेव्हाच ती पोटातून येईल. भाषेचा प्रश्न केवळ अस्मितेशी निगडित असतो असे नाही. तो ‘अस्तित्वा’शीच जास्त निगडित असतो. त्यामुळे मराठी हा विषय घेऊन करीअर करू इच्छिणार्या मुलांना, केवळ पदवी देणे, एवढ्याच कामात विद्यापीठांनी धन्यता न मानता, त्यांच्या पोटाचा प्रश्न सुटावा यासाठी नोकरीच्या आणि व्यवसायाच्या संधी त्यांच्यासाठी कशा निर्माण होतील, याकरिता थोडे चौकटीबाहेर जाऊन उद्योग-व्यवसाय क्षेत्राशी समन्वय साधला पाहिजे. त्यानुसार अभ्यासक्रमात बदल केले पाहिजेत. असे प्रयोग इतर सर्व ज्ञानशाखांमध्ये आज होत आहेत. भाषेचे शिक्षण म्हणजे केवळ ललित साहित्याचे शिक्षण नव्हे. व्यवहारात भाषा कशी वापरली जाते, शास्त्रीय लेखनात भाषेचे रूप कसे असते, विविध व्यवसायांत भाषा कशी वापरतात, साहित्यकृतींमध्ये भाषेची अभिव्यक्ती कशी होते, याचे शिक्षण दिले गेले पाहिजे. लोकमान्य टिळक म्हणत, ‘नाडीवरून ज्याप्रमाणे शरीरातील रोगाची अथवा स्वास्थाची परीक्षा होते, तद्वतच भाषेवरून राष्ट्राची बरी-वाईट स्थिती तज्ज्ञ लोक ताडतात. छत्रपती शिवाजीमहाराज जन्मण्यापूर्वी पोवाडे का झाले नाहीत? याचे कारण आता सांगण्याची जरूरी नाही. शिवाजीमहाराजांचा अभ्युदय म्हणजे मराठी भाषेचा अभ्युदय.’ लोकमान्यांच्या सांगण्याचे तात्पर्य एवढेच, की शासनाकडे इच्छाशक्ती असेल तर खूप काही घडू शकते. भाषेच्या संदर्भात सारे काही शासनाने करावे, ही भूमिकाही फारशी योग्य नाही. समाजाचीही भूमिका तेवढीच महत्त्वाची आहे. शासन, समाज, साहित्यसंस्था, ग्रंथालये, भाषातज्ज्ञ आणि विद्यापीठे यांच्यात सुसंवाद निर्माण झाला तर भाषेसंदर्भात चांगले खूप काही घडू शकते.
साक्षेपी समीक्षक आणि अ.भा. मराठी साहित्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव यांनी ‘समाज आणि भाषा’ या लेखात समाजाच्या भाषेसंदर्भातल्या अनास्थेवर बोट ठेवले आहे. ते म्हणतात, ‘लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य मराठीत लिहिले, ते मूलभूत समीक्षा किंवा गीताभाष्य मानले जाते. म्हणून जगभरचे गीताभ्यासक मराठी शिकतात व लोकमान्य टिळकांचे भाष्य समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आपण समाज म्हणून आणि आपली मराठी भाषा दोन्हीही अजून वसाहतिक पूर्वग्रहाचे बळी आहोत. तो पूर्वग्रह म्हणजे इंग्रजीशिवाय तरणोपाय नाही. हे खोटे नाही, पण मराठी समाजाला मराठीशिवाय तरणोपाय नाही, हे आपण स्वतःच्या मनावर व इतरांच्या मानसिकतेवर बिंबवले पाहिजे. समाजाला भाषा असतेच, पण भाषा हा समाजाचा सेंद्रिय घटक नव्हे. भाषा मरतात हा इतिहास आहे. त्या मृत भाषांचा समाज नष्ट होतो. मात्र त्यातील संचित टिकून राहते. ग्रीकांचे ज्ञानविज्ञान अरबांनी जपले, म्हणून टिकले. मराठीत टिकण्यासारखे आहेच आहे, पण त्यासाठी उद्या अरबांची मदत घेण्याची वेळ येऊ नये एवढंच!’ माय मराठीचा जयजयकार करताना आपल्यातली ‘मराठीपणाची’ ज्योत तेवत ठेवणे महत्त्वाचे आहे. भाषा आणि संस्कृतीची स्पंदने प्रथम मनात उमटतात. नंतर ती उच्चारातून आणि कृतीतून प्रकटतात. केवळ दिखाऊपणासाठी मराठीचे प्रेम नको. आंतरिक जाणिवेतून ते प्रकट होत राहिले, तर भाषा आणि संस्कृती कधीच मरत नाही.
प्रा. मिलिंद जोशी
(कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे)