
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
LPG Gas Supply : अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवर हल्ले करण्यास सुरुवात केली. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने या मार्गाची नाकेबंदी करण्याची घोषणा केली; हा मार्ग जगातील सुमारे २० टक्के तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. इराणकडून करण्यात आलेल्या नाकेबंदीमुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारपेठांमध्ये बरीच खळबळ उडाली आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे व्यापार सुरळीत ठेवण्यासाठी सरकारे आणि जहाजवाहतूक कंपन्यांना नवीन धोरणे आखावी लागली आहे. त्याचा परिणाम म्हणून दरांमध्येदेखील बरीच वाढ झाली आहे.
661 कोटींच्या हेराफेरीप्रकरणी मोठी धरपकड! चंदीगड ते दिल्ली- NCR पर्यंत CBI ची छापेमारी, प्रकरण काय?
या सगळ्या परिस्थितीचा संपूर्ण जगासोबतच भारतावरही मोठा परिणाम होत आहे. कारण भारत आपल्या ऊर्जेच्या गरजांसाठी या जलमार्गावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे; भारताचे सुमारे ३० टक्के कच्चे तेल आणि जवळपास ७० टक्के द्रवीभूत पेट्रोलियम वायू म्हणजेच LPG याच मार्गावरून वाहून नेला जातो. या सगळ्यामध्ये सध्याची परिस्थिती बरीच बिघडलेली असतना देखील भारताने या क्षेत्रातून जहाजांची सततची ये-जा सुरू ठेवण्यात यश मिळवले आहे.
फेब्रुवारीच्या उत्तरार्धात होर्मुझ भागात तणाव वाढला आणि निर्बंध लागू करण्यात आले होते. तेव्हा भारतीय ध्वज असलेली ३६ ते ३८ व्यापारी जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या परिसरात अडकली होती. या जहाजांवर १,१०० हून अधिक भारतीय खलाशी होते. यातील अनेक जहाजे भारताच्या ऊर्जा गरजा आणि व्यापारी पुरवठा साखळ्यांशी संबंधित अत्यावश्यक मालाने भरलेली होती, तर काही जहाजे औद्योगिक उत्पादन आणि देशांतर्गत वापरासाठी आवश्यक असलेल्या मालाची वाहतूक करणारी होती.
सरकारी आकडेवारीनुसार, मार्चच्या मध्यापासून भारतीय ध्वज असलेली सुमारे २३ ते २५ जहाजे होर्मुझ भागातून यशस्वीपणे बाहेर पडली आहेत. मे महिन्याच्या अखेरीस मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय ध्वज असलेली केवळ १३ जहाजे आखाती भागात किंवा सामुद्रधुनीच्या परिसरात शिल्लक होती. त्यांची सुरक्षित सुटका व्हावी हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार अत्यंत धडाडीने अत्यंत महत्त्वाची एक आपत्कालीन मोहीम राबवत आहे.
सरकार आणि पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनांनुसार, देशात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत आणि सुरक्षित आहे. ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’वरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशांतर्गत तेल शुद्धीकरण प्रकल्प त्यांच्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. यामुळे LPGचं दैनंदिन उत्पादन ५०,००० मेट्रिक टनांपर्यंत वाढलं आहे. त्याद्वारे देशाच्या एकूण मागणीपैकी ६० टक्क्यांहून अधिक मागणी पूर्ण होत आहे.
देशाला आश्वस्त करताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलंय की, “देशात घरगुती ग्राहकांसाठी एलपीजी सिलिंडरचा कोणताही तुटवडा नाही आणि गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे. नागरिकांनी अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही.” त्यामुळे भारतात सध्या तरी साठा मुबलक प्रमाणात असल्याचं स्पष्ट होतं.
मोठा झटका, घरगुती Cylinder च्या किमती पुन्हा कडाडल्या; सरकारची नेमकी भूमिका काय?