
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
Mango Export: भारतात उन्हाळ्याचा हंगाम हा केवळ उन्हाळा म्हणूनच नाही तर खास आंब्याचा सीझन म्हणून ओळखला जातो. ‘फळांचा राजा’ मानल्या जाणाऱ्या आंब्याचे महत्त्व इतके मोठे आहे की, परदेशातही त्याला मोठी मागणी असते. मात्र, अलीकडेच नेपाळमधून अशी एक बातमी समोर आली जिने आंबाप्रेमींची विशेषतः भारतात नव्हे, तर नेपाळमध्ये राहणाऱ्या आंबाप्रेमींनाही निराश केलं. आता मात्र सरकारने या बातमीबाबत स्पष्टता देत विधान केलं आहे.
नेपाळमध्ये भारतीय आंब्यांवर बंदी घालण्यात आल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. जपाननंतर नेपाळनेही भारतातून होणाऱ्या आंब्यांच्या आयातीवर बंदी घातल्याचे वृत्त अवघ्या गेल्या मंगळवारी समोर आले होते. भारतीय आंब्यांमध्ये कीटकनाशकांचे प्रमाण अधिक असल्याने ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात, असे कारण यासाठी दिले गेले होते. मात्र, सरकारने आता या बातम्या फेटाळून लावल्या आहेत.
या वृत्तांवर भारत आणि नेपाळ या दोन्ही सरकारांनी आता आपली प्रतिक्रिया दिली आहे. ही बातमी पूर्णपणे दिशाभूल करणारी असल्याचे सांगत, केंद्र सरकारने बुधवारी स्पष्ट केले: “काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तांमध्ये असा दावा केला जात आहे की नेपाळने भारतीय आंब्यांच्या आयातीवर बंदी घातली आहे; हा दावा पूर्णपणे चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे. विद्यमान नियमांनुसार ‘फायटो-सॅनिटरी’ अटींची पूर्तता केली जात असल्यास, आयात सुरूच आहे.” अशा विधानात त्यांनी या बातमीवर स्पष्टता दिली. दरम्यान, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने आपल्या निवेदनात नमूद केले की, नेपाळच्या ‘प्लांट क्वारंटाईन अँड पेस्टिसाईड मॅनेजमेंट सेंटर’ने १० जून रोजीच हे स्पष्ट केले होते की भारतीय आंब्यांवर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही.
नेपाळने अलीकडेच आपल्या आयात नियमांमध्ये बदल केले असून, फळे आणि इतर कृषी उत्पादनांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विशिष्ट उपाययोजना करणे अनिवार्य केले आहे. या घडामोडीमुळे अफवांना उधाण आले आणि भारतीय शेतकरी तसेच नेपाळी व्यापारी यांच्यात बऱ्याच प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, भारताने या वर्षी आतापर्यंत नेपाळला एकूण २,००५ टन वजनाचे आंब्याचे १४९ साठे निर्यात केले आहेत; त्यापैकी केवळ जून महिन्यातच २६६ टन वजनाचे १८ साठे निर्यात करण्यात आले आहेत.