फोटो सौजन्य - Social Media
राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या पॅट (PAT) परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील महापालिका शाळांमध्ये गंभीर गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर निवडणूक कामासाठी नियुक्त केल्यामुळे परीक्षा केंद्रांवर शिक्षकांची कमतरता भासली. परिणामी, काही शाळांमध्ये पर्यवेक्षक म्हणून सफाई कर्मचारी आणि पालकांची नियुक्ती करण्याचा अजब प्रकार घडला.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) दरवर्षी या परीक्षेचे आयोजन करते. यंदा ११, १५ आणि २२ एप्रिल रोजी परीक्षा होणार असून, शनिवारी प्रथम भाषेचा पहिला पेपर पार पडला. मात्र, अनेक शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध नसल्याने मुख्याध्यापकांसमोर परीक्षा सुरळीतपणे कशी पार पाडायची हा मोठा प्रश्न उभा राहिला. त्यातच काही ठिकाणी प्रश्नपत्रिकांची अपुरी उपलब्धता असल्याने परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली.
या पार्श्वभूमीवर, काही शाळांनी तात्पुरता उपाय म्हणून सफाई कामगारांना वर्गावर पर्यवेक्षक म्हणून पाठवले, तर काही ठिकाणी पालकांची मदत घेण्यात आली. मात्र, अशा पद्धतीमुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पर्यवेक्षणाचा अनुभव नसल्यामुळे विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात कॉपी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. शाळा प्रशासनाने परीक्षा कालावधीत शिक्षकांना निवडणूक कामातून सूट देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून पुढील पेपर सुरळीत पार पडू शकतील. अन्यथा आगामी परीक्षांमध्येही अशाच गोंधळाची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे.
एकीकडे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेण्यासाठी अशा परीक्षा घेतल्या जात असताना, दुसरीकडे व्यवस्थापनातील त्रुटींमुळे त्याच उद्देशावर पाणी फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. योग्य नियोजन आणि समन्वयाचा अभाव असल्यास शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर परिणाम होऊ शकतो, अशीही चर्चा सुरू आहे.






