फोटो सौजन्य - Social Media
मलकापूर : परीक्षा काळात एसटी बससेवेच्या अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. वेळेवर बस उपलब्ध न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला उशीर होत असून काही विद्यार्थ्यांना परीक्षाच गमवावी लागत आहे. सकाळी लवकर घरातून निघूनही बसफेऱ्यांचे योग्य नियोजन नसल्यामुळे विद्यार्थ्यांना बसस्थानकात ताटकळत थांबावे लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संतापाची भावना वाढताना दिसत आहे.
सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असून त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी खासगी क्लासेसलाही सुरुवात केली आहे. मात्र बससेवेतील गोंधळामुळे त्यांच्या दैनंदिन वेळापत्रकावर परिणाम होत आहे. वेळेवर बस न मिळाल्याने विद्यार्थ्यांना पर्यायी साधनांचा आधार घ्यावा लागत आहे; परंतु सर्व विद्यार्थ्यांना ते परवडणारे नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
याशिवाय, बस उशिरा येत असल्यास माहिती मिळवण्यासाठी असलेला चौकशी कक्षही निष्क्रिय असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. चौकशी कक्षातील एक फोन बंद असून दुसऱ्या क्रमांकावर कोणीही प्रतिसाद देत नसल्यामुळे प्रवाशांना कोणतीही अधिकृत माहिती मिळत नाही. त्यामुळे बस किती उशिरा येणार, याची माहिती नसल्याने विद्यार्थी अधिकच अडचणीत सापडत आहेत. वेळेवर माहिती मिळाल्यास विद्यार्थी ऑटोरिक्षा किंवा इतर वाहतुकीचा पर्याय निवडू शकले असते, मात्र माहितीअभावी त्यांची गैरसोय होत आहे.
या समस्येबाबत विद्यार्थ्यांनी तोंडी तसेच लेखी तक्रारी केल्या असतानाही प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही, असा आरोप करण्यात येत आहे. बसस्थानकांवर विद्यार्थी आणि प्रवासी दीर्घकाळ बसची वाट पाहत उभे असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी, वाहतूक व्यवस्थेतील नियोजनाच्या अभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, आगार व्यवस्थापक मुकुंद न्हावकर यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. बस उशिरा येत असल्यास चौकशी कक्षातून प्रवाशांना योग्य माहिती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. संबंधित कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही समस्या तातडीने सोडवून बसफेऱ्यांचे सुयोग्य नियोजन करणे अत्यावश्यक असल्याची मागणी आता जोर धरत आहे.






